प्रस्थापितांना हादरे; सामान्यांचा विजय
By Admin | Updated: October 20, 2014 00:17 IST2014-10-20T00:17:25+5:302014-10-20T00:17:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यात भल्या माणसांना जनतेची पसंती; राष्ट्रवादीचे घड्याळ बंद तर भारिपचा भोपळा.

प्रस्थापितांना हादरे; सामान्यांचा विजय
राजेश शेगोकार /बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाचे दर्शन घडविणारे आहे. संपत्तीमधून सत्ता व सत्तेमधून संपत्ती या दुष्टचक्रामुळे सामान्यांना राजकारणाचा तिटकारा येऊ लागला होता. प्रत्येक निवडणुकीत तेच ते चेहरे आलटून पालटून लोकांसमोर येत होते. यावेळी मात्र लोकांनी नव्या चेहर्यांना पसंती देत जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्रच बदलवून टाकले आहे. राजकारणातील भल्या माणसांना ताकद देऊन सामान्यांनी इतिहास घडविला.
निकालाच्या आकडेवारीमध्ये काँग्रेसची संख्या कायम राहिली असली तरी खामगावा तील काँग्रेसचा पराभव पक्षासाठी धक्कादायक आहे. असाच प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडला. सेनेच्या जागा दोन जागा कायम राहिल्या असल्या तरी बुलडाण्यात सेनेला मिळालेले चौथे स्थान लाजीरवाणे ठरले आहे. तिकिटासाठी रातोरात पक्ष बदलवून निवडणूक लढविणार्यांनाही जनतेने नाकारले.
बुलडाणा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. विचार, विश्वास व विकास या मुद्दय़ांवर रिंगणात उतरलेले हर्षवर्धन सपकाळ हे विरोधकांपेक्षाही स्वपक्षीयांच्या टीकेचे व चेष्टेचे विषय बनले होते. तरीही केवळ सामान्यांचा विश्वास व त्यांच्याच लोकवर्गणीच्या भरवशावर सपकाळ यांनी विजय मिळविला. विशेष म्हणजे, दुसर्या क्रमांकावर शिवसेना किंवा भाजपा राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, मनसेच्या संजय गायकवाड यांनी सपकाळांच्याच प्रचार तंत्रासारखा प्रचार राबवून दुसर्या क्रमांकावर झेप घे तली.
भाजपच्या योगेंद्र गोडे यांनी पक्षबदल करून लढविलेली निवडणूक ही अतिशय नियोजनबद्ध होती. त्यांनी प्रचाराचा धडाका उडवला. मात्र, पैशांचा अतिवापर झाल्याचा प्रचार त्यांच्या अंगलट आला.
शिवसेनेचे विजयराज शिंदे हे जनता गाडी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, जनतेची सुप्त नाराजी ते ओळखू शकले नाहीत. सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीत निर्माण झालेली अस्वस्थता मतपेटीतून उमटली.
ठळक वैशिष्ट्ये
* जातीय राजकारणाला पुर्णविराम या निवडणुकीच्या निमित्याने मिळाला आहे. सर्वसामान्य मतदारांनी ताकद दाखविली.
*नेहमीप्रमाणे सर्वांत आधी मेहकर मतदारसंघाचा निकाल आला व सर्वांत शेवटी मलकापूर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. खामगावबाबत राज्यभरात उत्सुकता होती.
*मोदींची सभा झालेल्या ठिकाणी भाजपचा विजय झाला, तर राहुल गांधी यांच्या सभाक्षेत्रात काँग्रेस विजयी झाली. मात्र, उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा पराभव झाला.