खाऊच्या वाटपासोबत फुलांनी स्वागत
By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:40:57+5:302014-06-26T02:05:22+5:30
शाळांना सुरूवात : आज वाजणार शाळेची पहिली घंटा

खाऊच्या वाटपासोबत फुलांनी स्वागत
बुलडाणा : तब्बल दोन महिन्यांच्या सुट्यांनंतर गुरूवारी शाळा सुरू होत आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेत आल्यानंतर मुलांना शाळेबद्दल गोडवा निर्माण व्हावा, तसेच नवीन मुलांना शाळेची भीती वाटू नये, यासाठी राज्य सरकार विविध प्रयत्न करीत आहे. पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणात मुलांना गोडधोड खाऊ घालून मुलांचे स्वागत करा, असे आदेश शासनाने शाळांना दिले आहेत.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे सारे काही नवे. आई नाही, बाबा नाही, घरचे कुणी नाही. शिक्षकही नवे आणि आसपासची इतर मुलेही नवीच. शाळेचा पहिला दिवस हा सहसा असाच असतो. त्या अंतर्गत शाळांनी तयारी पूर्ण केली असून, शाळेतील शिक्षकांना सकाळी लवकर शाळेत हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दाखल झालेले विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांची माहिती शासनाला ऑनलाइन कळविली जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून चिमुकल्यांच्या शाळेची जी तयारी केली जात होती ती आता थंडावणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोमवारी होत आहे. विद्यार्थ्यांनीही नवी पुस्तके, दप्तर आणि गणवेशाची खरेदी केली असून, शाळेत जाण्यासाठी त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे.