पाच महिन्यांत १९ लाखाचा दंड वसूल
By Admin | Updated: June 12, 2014 20:51 IST2014-06-12T20:51:11+5:302014-06-12T20:51:54+5:30
५ महिन्यात वाहतूक पोलिसांनी उपविभागात १९ लाख ८६ हजार ५00 रु. दंड वसूल केला आहे.

पाच महिन्यांत १९ लाखाचा दंड वसूल
खामगाव : उपविभागामध्ये वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी चांगलीच मोहीम उघडली आहे. गत १ जानेवारी ते ३१ मे पर्यंत अशा ५ महिन्यात वाहतूक पोलिसांनी उपविभागात १९ लाख ८६ हजार ५00 रु. दंड वसूल केला आहे.
वाहतूक परवाना नसणे, वाहन परवाना, अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करणे, गाडिची कागदपत्रे नसणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केसेस करुन दंड वसुल केला. खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या टॅक्सी, रिक्षा मधून अनेक वेळा अवैध वाहतूक केली जाते. वाहतूक परवान्यापेक्षा जास्त प्रवाशी बसवले जातात. चालकाच्या जवळ चार- पाच प्रवाशी बसवल्या जात असल्यामुळे त्या चालकाला गाडी चालवताही येत नाही. अशा परिस्थितीत अपघात होण्याचा धोका अनेक पटीने वाढलेला असतो. याकडे दुर्लक्ष करुन बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे.
याकडे पोलिसांनी लक्ष देऊन या वाहतूकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मोटारसायकल स्वार कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता भरधाव गाड्या चालवतात. त्यामध्ये जीवाला धोका असून सुद्धा ते त्याकडे लक्ष देत नाही.
अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. आपला जीव धोक्यात टाकून ते इतरांचेही जीवन धोक्यात टाकतात. त्यामुळे बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
** १४ हजार ९९0 केसेस
मागिल पाच महिन्यात १४ हजार ९९0 केसेस केल्या आहेत. यामध्ये अवैध प्रवासी वाहतूकीच्या ६९५ केसेस करुन ५ लाख ७२ हजार २00 रुपये तर १४ हजार २९५ केसेस बेशिस्तपणे वाहन चालविणे, गाडीची कागदपत्र नसणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंन करणार्यांवर केल्या आहेत. यामध्ये जवळपास १३ लाख ९९ हजार ३00 रुपये दंड वसूल केला आहे.