नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
By Admin | Updated: April 17, 2017 00:58 IST2017-04-17T00:58:47+5:302017-04-17T00:58:47+5:30
मेहकर- शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला.

नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
मेहकर: नाफेडच्या वतीने तूर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवराव जाधव आणि तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व माल नाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. रायमुलकर यांनी दिला.
नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी तूर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजार समितीने संबंधितांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचन सुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरा येथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारात येत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्था सुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत तूर खरेदी करण्यात येईल, असा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी काढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी एकच गर्दी करून जवळपास ५०० ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावा यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापती माधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोद बापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख, भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदींनी तहसीलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजेपर्यंत बाजार समिती यार्डात तूर घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येऊन तूर खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
काहीनी पांढरी तूर खरेदी केल्या जात नाही, अशी तक्रार करताच सदर तूर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे हे नाफेडचे काम असून, मेहकर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची तूर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तूर खरेदीसाठी बारदाना, धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तूर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी, अशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली.