तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

By Admin | Updated: April 24, 2017 02:53 IST2017-04-24T02:53:09+5:302017-04-24T02:53:09+5:30

१७७ कोटींचे चुकारे : १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

Farmer suffers due to purchase of tur. | तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त!

बुलडाणा : खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी शासनाने नाफेड व एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून, तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला आहे. हमीभावाचे चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करून खरेदी बंद करण्यात आली. तरीही विविध खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी खरेदी केंद्रावर असलेली तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.
नाफेडने जिल्ह्यातील शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिंदखेड राजा या खरेदी केंद्रावरून २२ एप्रिल अखेर २ लाख २६ हजार २०५ क्विंटल, तर एफसीआयच्यावतीने खामगाव, मलकापूर, लोणार, नांदुरा जळगाव जामोद या खरेदी केंद्रावरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तरीही खरेदी केंद्रावर जवळपास १.७५ लाख क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे.
यावर्षी शासनाने नाफेड एफसीआयच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करून तुरीला ५०५० रुपये हमी भाव दिला आहे. हमी भाव चुकारे लवकर मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, खरेदी केंद्रावर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे काही दिवसातच बारदाना संपून गेला होता. विविध पक्ष संघटनाच्या आंदोलनानंतर शासनाने बारदाना उपलब्ध करून दिला होता; परंतु तुरीची आवक पाहता शासनाने तूर खरेदीची मुदत ही २२ एप्रिलपर्यंत ठरवून दिली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नाफेडने सात खरेदी केंद्रांवरून २ लाख २६ हजार २०५ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तर एफसीआयने पाच खरेदी केंद्रांवरून २ लाख २७ हजार ९७, अशी एकूण ४ लाख ५३ हजार ३०२ तुरीची खरेदी केली आहे. दरम्यान, नाफेडने ११४ कोटी रुपयांच्या तुरीची खरेदी केली. त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. एफसीआयने ११४ कोटी ६८ लाख ६० हजार ९५४ रुपयांची तूर खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ९४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक फटका
नाफेड एफसीआयच्या खरेदी केंद्रावर जवळपास पावणे दोन लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाचे तूर खरेदी केंद्र बंद झाल्यास नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात आपली तूर खासगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. परिणामी त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर असलेली तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत.

शासनाने २२ एप्रिल ही तूर खरेदीची मुदत दिली होती. त्यामुळे आजपर्यंत नाफेडने २ लाख २६ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असून, त्यापैकी शेतकऱ्यांना ८२ कोटींचे चुकारे देण्यात आले आहेत. यानंतर शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
- पी.एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Farmer suffers due to purchase of tur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.