नजरा आभाळाकडे

By Admin | Updated: July 10, 2014 19:13 IST2014-07-09T00:32:07+5:302014-07-10T19:13:17+5:30

पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

Eyes to the sky | नजरा आभाळाकडे

नजरा आभाळाकडे

बाश्रीटाकळी : आकाशाकडे आस लावून बसलेल्या बळीराज्याच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. आता बळीराजांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी ठिबकचे पीकही धोक्यात आले आहे. बी-बियाणे व खतांची खरेदी झाल्याने बळीराजाकडे असलेला पैसा गुंतून पडला आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. यंदा पाऊस लवकर पडेल, या आशेने शेतकर्‍यांनी अगोदरच खते व हव्या असलेल्या निवडक वाणांचे बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. पाऊस पडल्यास वेळेवर हवे ते बियाण्यांचे वाण मिळत नाही. त्यामुळे अगोदरच बियाण्यांची खरेदी करून ठेवावी लागते. आता प्रतीक्षा आहे ती जोरदार पाऊस पडण्याची. राजंदा परिसरात पाणी पातळी खालावल्याने शेती पीक अडचणीत आले आहे. उन्हाळ्यासारखे तापमान असल्याने जमिनीला आता पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील अनेक गावांत विहिरीतील पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतकर्‍यांना पिकाच्या पाण्याबरोबरच गुरांच्या पाण्याचेही नियोजन करावे लागत असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. चारा टंचाई आणि पाणी टंचाई यामुळे शेतकरी हैराण झाला असून जनावरांची विक्री करीत आहेत. बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक गावात हिच परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. मागील वर्षाप्रमाणे मृग नक्षत्राचा पाऊस होऊन पेरणी सुरू करू, असा मानस असताना एक दिवस वादळी बेमोसमी पाऊस झाला व फायद्यापेक्षाही नुकसान करून गेला. शेतकर्‍यांनी मशागत करू न मोठय़ा प्रमाणात खर्च केला. महागडी बियाणे खरेदी केली; परंतु पावसाने चिंता वाढविली आहे. महागडी बियाण्यांची पेरणी करू नही पीक घरात येईलच, याची काही शाश्‍वती नसल्यामुळे बळीराजा आतापासूनच संकटात सापडला आहे. मागील वर्षी निसर्गाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या झाल्या होत्या. मृग नक्षत्रात पेरण्या झाल्यास उत्पन्न वाढते, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. २0१३ च्या दुष्काळाच्या जखमा अद्यापही भरल्या नसल्याने पाऊस कमी झाल्यास बळीराजा संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Eyes to the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.