वर्षपूर्तीनंतरही अस्वच्छताच !
By Admin | Updated: October 2, 2015 02:16 IST2015-10-02T02:16:58+5:302015-10-02T02:16:58+5:30
खामगावातील शासकीय कार्यालयात स्वच्छतेबाबत दक्षता नाही.

वर्षपूर्तीनंतरही अस्वच्छताच !
खामगाव : गेल्यावर्षी संपूर्ण देशात २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करून प्रारंभ झाला. शुक्रवारी या अभियानाची वर्षपूर्ती होत आहे. त्या पृष्ठभूमीवर शहरातील शासकीय कार्यालय व परिसरातील स्वच्छतेसंदर्भात १ ऑक्टोबरला पाहणी केली असता, सर्वत्र स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले. शहरातील एसडीओ कार्यालय, पंचायत समिती, सर्व शिक्षा अभियान, सेतु कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेची १ ऑक्टोबर रोजी पाहणी केली असता, तेथे अस्वच्छता आढळून आली. पंचायत समितीमधील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या जिन्यावरील खिडकीवर दर्शनी भागातच गांधील माश्यांचे पोळे आढळून आले. त्यावरून स्वच्छतेबाबत हे कार्यालय किती गंभीर आहे हे दिसून येते. गेल्यावर्षी महात्मा गांधी जयंतीला संपूर्ण जिल्ह्यासह देशात स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. स्वच्छतेचा वसा घेण्याची शपथ घेत अनेकांनी या मोहिमेत स्वत:ला झोकून दिले होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनचा कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय निर्मितीसह घनकचरा व्यवस्थापनास प्रारंभ करण्यात आला. गावांचे घनकचरा व्यवस्थापनाचे आराखडेही तयार करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समितीमधील सर्व शिक्षा अभियान कार्यालय, सेतु केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली असता, स्वच्छतेबाबत येथे गंभीरता दिसून आली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागाच्या डाव्या बाजूलाच २५ ते ३0 मीटर अंतरावर कचर्याचा मोठा ढीग दिसून आला. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. विशेष म्हणजे, सांडपाण्याच्या निचर्यासाठी बांधलेल्या नालीतच कचरा आढळला. प्रसूती विभागातील खिडक्यांमधूनही अन्न थेट बाहेर फेकलेले दिसून आले. पंचायत समितीमधील सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील जिन्यावरील खिडकीमध्येच गांधील माश्यांचे भलेमोठे पोळे दिसून आले. यांचा कर्मचार्यांसह कामानिमित्त येणार्या नागरिकांनाही धोका होऊ शकतो.