खामगाव कृउबाससाठी चुरशीचे मतदान
By Admin | Updated: June 28, 2015 23:13 IST2015-06-28T23:13:14+5:302015-06-28T23:13:14+5:30
९0 टक्केच्या वर मतदान; ४७ उमेदवारांच्या भाग्याचा होणार फैसला.

खामगाव कृउबाससाठी चुरशीचे मतदान
खामगाव (जि. बुलडाणा) : जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २८ जून रोजी चुरशीचे मतदान झाले. सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ९0 च्या वर झाले. स्थानिक इंदिरा गांधी नगर परिषद माध्यमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील हाणामारीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून, ४७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी २८ जून रोजी तालुक्यातील एकूण १२ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, अडते, व्यापारी व हमाल मापारी मतदारसंघातून २९८७ पैकी एकूण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघामध्ये एकूण ६९९ पैकी ६९0, ग्रामपंचायत मतदारसंघात ७८८ पैकी ७६२, व्यापरी मतदारसंघात ७६७ पैकी ७२६, हमाल मापारी मतदारसंघात ७३३ पैकी ६७0 मतदारांनी मतदान केले. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गातून ७ उमेदवार निवडून द्यावयाचे असून, या प्रवर्गात १९ उमेदवार रिंग्ंणात होते. याच प्रवर्गातील महिला राखीव प्रवर्गात दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागासवर्गीय एका जागेसाठी २ उमेदवार तर वि.जा. व भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी ७ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी दोन, दुर्बल घटक प्रवर्गातील एका जागेसाठी दोन, अडते/व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी चार उमेदवार तर हमाल/ मापारी प्रवर्गातील एका जागेसाठी चार असे एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत भाराकाँ-भारिप बमसं प्रणित शेतकरी प्रगती पॅनलच्यावतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदाच्या नेतृत्वात १८ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे सर्मथन होते. तर भाजप पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व आ. भाऊसाहेब फुंडकर तथा आ. आकाश फुंडकर यांनी केले. त्यांना भारिप बमसं दुखावलेल्या गटासह, राष्ट्रवादीतील एका गटाचे सर्मथन होते. दोन्ही पॅनलच्यावतीने शक्ती पणाला लावण्यात आल्यामुळे चुरशीचे मतदान झाले.