नेतृत्वगुण विकासासाठी निवडणूक आवश्यक
By Admin | Updated: July 16, 2015 01:31 IST2015-07-16T01:31:33+5:302015-07-16T01:31:33+5:30
लोकमत परिचर्चेत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांचा सूर.
_ns.jpg)
नेतृत्वगुण विकासासाठी निवडणूक आवश्यक
बुलडाणा : महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. गेल्या १९९२ पासून या विद्यार्थी परिषद निवडणुकींवर बंदी घातली आहे. आता ही बंदी उठवून निवडणुकी पुन्हा सुरू झाल्यास निश्चितच आनंद होईल. नेतृत्वगुणांच्या विकासासाठी निवडणुकी आवश्यकच आहेत, असा सूर लोकमत परिचर्चेत सोमवारी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्यांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी परिषद निवडणूकया विषयावर विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली असता, विद्यार्थी नेत्यांसह विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकी खुल्या पद्धतीने तसेच मोकळ्या वातावरणात व्हाव्यात, यावर सर्वांचे एकमत झाले. राजकीय हस्तक्षेप आणि दबावदेखील या निवडणुकींमध्ये येता कामा नये. खुल्या आणि मोकळ्या वातावरणात निवडणुकी घेण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत याबाबतही शासनाने आधी भूमिका स्पष्ट करावी, असे मतदेखील विद्याथ्र्यी नेत्यांनी मांडले. या निवडणुकींना हिंसक वळण लागणार नाही, याचीही काळजी राज्य शासनाला घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परिचर्चेत मनसे विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष शैलेंद्र कापसे, महाविद्यालयीन विद्यार्थी कन्हैया माटोले, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, भाजप विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नितीन बेंडवाल, स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन तसेच रुद्र ग्रुपचे गौरव टाकसाळ यांनी सहभाग नोंदविला.