दारूबंदीमुळे अपघातांच्या प्रमाणात निश्चितच घट होईल!
By Admin | Updated: April 19, 2017 23:47 IST2017-04-19T23:47:10+5:302017-04-19T23:47:10+5:30
लोकमत परिचर्चेतील सूर : महामार्गालगत दारूबंदीचा निर्णय स्वागतार्ह

दारूबंदीमुळे अपघातांच्या प्रमाणात निश्चितच घट होईल!
बुलडाणा : राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातास दारू पिवून वाहन चालविणारे कारणीभूत असतात. त्यामुळे न्यायायलाने एका निर्णयान्वये राज्य महामार्गालगत ५०० मीटर व २० हजार लोकसंख्या असलेल्या गाव परिसरातील २५० मीटरलगत असलेले बीअर बार व वाईन शॉप बंदीचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा सूर बुधवारी राज्य महामार्गालगत दारूबंदीमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल का? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला.
राज्य महामार्ग किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या अपघातास ९० टक्के दारू कारणीभूत असते. दारू पिल्यामुळे अपघात होत असतात. त्यामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागते, तर काही कुटुंबीयांना सदस्य गमवावे लागतात. दारू पिण्यामुळे राज्य महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या एका आदेशान्वये संपूर्ण राज्यात राज्य महामार्गावरील बीअर बार व वाईन शॉप बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे राज्य महामार्गावर दारू सहज उपलब्ध होणे कठीण झाले आहे. या निर्णयामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे, तर राज्य महामार्गावर दारूबंदी केली असली, तरी अवैधरीत्या दारू विक्री सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले.
दारूबंदीचा निर्णय चांगला असून, नवीन परवाने मिळण्यासाठी अडचणीचे जाणार असून, आपल्या गाव परिसरात परवाने मिळू नये म्हणून अनेक महिला विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
अपघात झाल्यानंतर जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. त्यातील अनेक रुग्णांचे अपघात दारू पिल्यामुळे झालेले असतात, तर काही अपघातात वाहन चालकाने दारू पिल्यामुळे अपघात होऊन समोरील वाहनचालकांना जखमी केलेले असते. त्यामुळे अपघातासाठी जी कारणे कारणीभूत आहेत, त्यात दारू पिल्याचे कारण जवळपास ९० टक्के अपघाताच्या घटनेस कारणीभूत आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य महामार्गवर सहज उपलब्ध होणारी दारूबंदी केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. अशोक भवटे, बुलडाणा.
राज्य महामार्गालगत दारू विक्रीची दुकाने असल्यामुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला दारू सहज उपलब्ध होत असते. त्यातही स्वस्त दारू मिळत असते. त्यामुळे महामार्गालगत होणारे अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येते. न्यायालयाने महामार्गालगत दारू विक्री बंद केल्यामुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला दारू सहज उपलब्ध होणार नाही. तसेच महामार्गापासून दारू विक्री काही अंतरावर होत असल्यमुळे प्रवासी किंवा वाहन चालकाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. अशा अनेक कारणांमुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल.
- अॅड. शरद राखोंडे, बुलडाणा.
राज्य महामार्गालगत झालेली दारूबंदीचा काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अनेक प्रवासी किंवा वाहनधारकांना अवैधरीत्या दारू मिळत आहे. त्यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. अपघाताचे प्रमाण कमी करायचे असेल, तर संपूर्ण दारूबंदी करणे आवश्यक आहे. दारू पिणाऱ्याला दारू मिळत असल्यास सहज उपलब्ध होत असते. त्यामुळे संपूर्ण दारूबंदी झाल्यास प्रवासी किंवा वाहनधारकांना दारू मिळणार नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. यासाठी संपूर्ण दारूबंदी करणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वर वायाळ, अध्यक्ष, माध्य. व उच्च. शिक्षक संघटना, जि.प.,बुलडाणा.
राज्य महामार्गावर दारू पिवून बेधुंद गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले होते. दारू पिवून गाडी चालविणारे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात आणत होते. वेळोवेळी होणारे भीषण अपघात त्याचे बोलके उदाहरण आहे. नवीन निर्णयामुळे आता राज्य महामार्गावर दारू मिळणार नसल्यामुळे नेहमी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण येईल. दारू पिवून अपघातात जायबंदी होणाऱ्या व्यक्तींचे फार मोठी संख्या आहे. अपघाताचे परिणाम त्यांना जन्मभर भोगावे लागतात. अनेकांना जीवन जगणे कठीण होते. त्यामुळे महामार्गालगत होणारी दारू विक्री बंदीचा निर्णय चांगला व स्वागतार्ह आहे.
- मृणालिनी पाथरकर, सदस्य, संत सेवा संघ, बुलडाणा.
महामार्गालगत होणारे अपघात फार भीषण असतात. अशा अपघातात सर्वच कुटुंब नष्ट झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. महामार्गालगत झालेल्या घटना दारू पिवून झालेल्या असल्याचे दिसून येते. दररोज घडणाऱ्या अपघातामध्ये दारू पिवून झालेल्या अपघाताचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. अपघात हे दारू पिल्यामुळेच होतात, म्हणून उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अतिशय चांगला व स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करणे आवश्यक आहे.
- वैशाली राठोड, बुलडाणा.