खडकपूर्णाचे पाणी सोडल्याने पिकांना जीवदान

By Admin | Updated: July 22, 2015 23:59 IST2015-07-22T23:59:29+5:302015-07-22T23:59:29+5:30

चिखली तालुक्यातील सहा हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी.

Due to the release of water from the rocks, the lifting of the crops | खडकपूर्णाचे पाणी सोडल्याने पिकांना जीवदान

खडकपूर्णाचे पाणी सोडल्याने पिकांना जीवदान

चिखली (जि. बुलडाणा) : जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात आहेत. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकर्‍यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीपणामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली. ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आणि लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांची पिके वाचविण्यात यश आले.
जिल्ह्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र तसे फारच कमी आहे, केवळ विहिरी आणि नद्यावरूनच शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळत असे; मात्र चिखलीचे तत्कालीन आमदार भारत बोंद्रे यांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीवर मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे पेनटाकळी प्रकल्पाचे काम सुरु झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भारत भाऊंचा पाटबंधारे मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांनी खडकपूर्णा आणि जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी वेगाने प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून खडकपूर्णा प्रकल्पाला मंजुरात मिळवूनही घेतली. खडकपूर्णा प्रकल्पाचे भूमिपूजन ना.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले आणि या खडकपूर्णाचे काम पुर्णत्वाकडे जात असतानाच प्रकल्पातील पाण्याचा लाभ तालुक्यातील शेतकर्‍यांना होत असल्याचे समाधान आज या प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ ची पाहणी करताना शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते.
खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ चा लाभ हा पुर्णपणे चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांना होणार आहे. यामध्ये तालुक्यातील भरोसा, रामनगर, रोहडा, गांगलगाव, कवठळ, मुरादपूर, देऊळगाव घुबे, अमोना, कोनड, कोलारा, भालगाव अश्या गावांना या टप्प्याचा लाभ होणार आहे. काहींना आजच होत आहे. यावर्षी मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतर महिनाभरापासून पावसाने उघाड दिल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. अश्यातच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी अमरावती विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करुन या परिसरातील शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली आणि ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली

Web Title: Due to the release of water from the rocks, the lifting of the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.