भूजल पातळी वाढल्याने विभाग टँकरमुक्त
By Admin | Updated: May 16, 2014 00:06 IST2014-05-16T00:00:36+5:302014-05-16T00:06:07+5:30
अमरावती विभागात जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने यावर्षी प्रथमच टँकरचे प्रमाण विभागात घटल्याचे चित्र दिसत आहे.

भूजल पातळी वाढल्याने विभाग टँकरमुक्त
बुलडाणा : २0१३ या वर्षात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे तुडुंब भरले. सिंचन तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले. परिणामी, अमरावती विभागात जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने यावर्षी प्रथमच टँकरचे प्रमाण विभागात घटल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण अमरावती विभागात सद्यस्थितीत केवळ २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे चटके सहन करणार्या अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यातील शेतकर्यांना सतत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी जेथे नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत होती, तेथे पिकं जगविणे कठीण झाले होते. पाऊसच नसल्याने शेती पिकाच्या उत्पादनात घट झाली, त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. त्यातून अनेक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसला तो बुलडाणा जिल्ह्याला. गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला तब्बल १९३ टँकर लावावे लागले होते. तरीही पाण्यासाठी लोकांची ओरड सुरूच होती. ह्यआडातच नाही तर, पोहर्यात कोठूनह्ण, अशी अवस्था असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले होते. २0१३ चा ती पाणी टंचाई आजही अंगावर शहारे आणणारी आहे; मात्र या उन्हाळ्यात बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात जेमतेम ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणी पुरवठय़ासाठी प्रशासनाकडून आठ टँकर लावण्यात आल्याची माहिती आहे. २0१३ मध्ये अमरावती विभागात १७९ गावे पाणी टंचाईच्या विळख्यात होती; मात्न यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने पाणी टंचाईच्या झळा फार कमी गावांना आहेत. मागीलवर्षी अकोला जिल्ह्यात चार, वाशिममध्ये नऊ आणि यवतमाळ जिल्ह्यात सात गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशिम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नसल्याची माहिती आहे. सरत्या पावसाळ्यात निसर्गाची साथ मिळाली. सरासरीपेक्षा अमरावती विभागात दुप्पट पाऊस झाला. या पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये भरमसाठ वाढ झाली. तर पावसाळा संपल्यानंतरही एप्रिल, मेपर्यंत अधूनमधून अवकाळी पाऊस सुरूच आहे. याचाही लाभ बर्यापैकी झाल्याने पाणी टंचाईची समस्या दूर झाली व या उन्हाळ्यात तरी बुलडाणा जिल्हा काही अंशी टँकरमुक्त जिल्हा झाला.