दुष्काळामुळे शेतक-यांनी पशुधन विक्रीला काढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:24 IST2016-04-22T02:24:28+5:302016-04-22T02:24:28+5:30
खामगाव येथील गुरांचा बाजारात जनावरांची आवक वाढली!

दुष्काळामुळे शेतक-यांनी पशुधन विक्रीला काढले!
खामगाव (जि. बुलडाणा): दुष्काळाचे चटके तीव्र होत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीला काढण्यास सुरुवात केली आहे. खामगाव येथील गुरुवारच्या आठवडी बाजारात जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून आलेल्या बैलांची आवक वाढली असून, विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकर्यांना जमिनीने साथ दिली नाही. परिणामी, कर्जाचा बोझा आणखी शेतकर्यांच्या डोक्यावर वाढला आहे. कर्ज फेडणे होत नसल्याची चिंता एकीकडे सतावत असताना शेतकर्यांजवळ असलेल्या पशुधनाला आता जगवणे कठीण झाले आहे. आतापर्यंत जनावरांचा चारा कसाबसा पुरवला; मात्र यापुढे चारा तुटवडा निर्माण झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाईचे चटके ग्रामीण भागास सोसावे लागत आहेत. माणसाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना जनावरांचे कसे होईल, खरीप पेरणीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी राहिला असताना या कालावधीत बैलांना पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने उपाशीपोटी बैलांकडे पाहावल्या जाणार नाही, या भावनेने शेतकर्यांनी बैल विक्रीला काढले आहेत.