द्वारपोच योजना थंड बस्त्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:01 IST2017-07-31T23:58:07+5:302017-08-01T00:01:57+5:30

द्वारपोच योजना थंड बस्त्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.
ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेवर अन्नधान्य मिळावे, अन्नधान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने मागील वर्षीपासून द्वारपोच योजना सुरू केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील द्वारपोच योजनेचे कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे राजीव गुप्ता यांनी घेतलेले आहे. त्यांनी मेहकर तालुक्यात अन्नधान्य द्वारपोच पोहचविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली होती. या वाहतूक ठेकेदाराने जवळपास सात वाहने या योजनेसाठी लावलेली होती. सुरुवातीच्या काळात ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर या द्वारपोच योजनेचा पूर्ण कारभार ढेपाळला होता. नियोजनाअभावी दुकानदारांचा माल वेळेवर जात नव्हता. त्यामुळे गोरगरिबांना वेळेवर धान्य पुरवठा होत नव्हता. मात्र, तेरी भी चूप मेरी भी चूप, असा कारभार सुरू असल्याने कोणीच बोलायला तयार नव्हते. अनेक दुकानदारांचा माल कमी-जास्त प्रमाणात जात होता. दरम्यान, गेल्या १० ते ११ महिन्यांपासून मेहकर तालुक्यात द्वारपोच योजना सुरू आहे; परंतु वाहतूक ठेकेदाराचे बिले थकली आहेत.
वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळी
द्वारपोच योजना राबविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराने मेहकर तालुक्यासाठी गेल्या १० ते ११ महिन्यांपासून सात वाहने लावली होती. या वाहनधारकांना दरमहा वाहतुकीची बिले मिळाली नसून, जवळपास २० लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळी आली आहे.
वाहतूक ठेकेदाराने त्यांची बिले न मिळाल्याने वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीपण दुकानदारांना माल वेळेवर मिळावा, यासाठी पर्यायी व्यवस्था करुन, दुकानदारांना वेळेवर माल देऊ.
- ए.एम. सय्यद
निरीक्षण अधिकारी, अन्नपुरवठा विभाग, मेहकर.