गटातटाचे राजकारण नको!
By Admin | Updated: June 20, 2015 02:55 IST2015-06-20T02:55:33+5:302015-06-20T02:55:33+5:30
शिवसेनेचा वर्धापन दिन; प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

गटातटाचे राजकारण नको!
बुलडाणा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत परिश्रम व कष्टाने शिवसेना ही संघटना उभी केली. याच संघटनेचा पक्ष झाला. महाराष्ट्रातील गावागावात बाळासाहेबांच्या कडव्या हिंदुत्ववादी विचाराचे सैनिक तयार झाले. अनेकांना पद, प्रतिष्ठा, सत्ता मिळाली. ती केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावरच. म्हणून शिवसैनिक हाच पक्षाची खरी ताकद आहे. पक्ष ५0 वर्षांचा झाला. या प्रवासात पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. शिवसेनेत जाती-पातीचं, गटा-तटाचं राजकारण चालत नाही. म्हणून येणार्या काळात कोणीही गटातटाचं राजकारण न करता पक्ष वाढीसाठी व ह्यगाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिकह्ण या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देत पक्षासाठी काम करा, शिवसेना व शिवसैनिक हेच महत्त्वाचे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा खा. प्रतापराव जाधव यांनी शुक्रवार १९ जून रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. डॉ. संजय रायमुलकर, माजी आ. विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, दत्ता पाटील, बाजर समिती संचालक जालींधर बुधवत, माजी जिल्हाप्रमुख ज्ञानदेव मानकर, महिला प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे, शांताराम जगताप, मुन्ना बेंडवाल, डॉ. प्रतापसिंग राजपूत, उपस्थित होते. या मेळाव्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, बुलडाण्याच्या माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, जळगाव जामोदचे माजी नगराध्यक्ष गजानन वाघ व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पुन्हा प्रवेश घेतला. खा. जाधव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना धूळ चारली. सारेच सहकारातील नेते एकत्र येऊनही आपण अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली. येणार्या काळात आता ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारी ठेवावी, असेही आवाहन खा. जाधव यांनी केले.