तर सावकारांच्या घरासमोर धरणे- विद्या चव्हाण
By Admin | Updated: May 26, 2017 01:26 IST2017-05-26T01:26:11+5:302017-05-26T01:26:11+5:30
जिल्हाधिकारी, उपनिबंधकांच्या उपस्थितीत बैठक

तर सावकारांच्या घरासमोर धरणे- विद्या चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भोळ्याबाभड्या शेतकऱ्यांची फसवणूक करून अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देऊन सावकारांवर कारवाई झाली नाही, तर त्यांच्या घरासमोर धरणे देऊ, असा इशारा आ. विद्या चव्हाण यांनी गुरुवारी दिला.
आ. विद्या चव्हाण यांनी जिल्हाभरातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तपासली, तसेच जिल्हा उपनिबंधक व जिल्ह्यातील सर्व एआर यांची बैठक घेतली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर आ. चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत आ. चव्हाण यांनी जिल्ह्यातील १८ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला असल्यावरही सावकारांवर गुन्हे दाखल झाले नाही. सावकारांना पाठीशी घालणाऱ्या एआरला निलंबित करण्याची मागणी केली. काही अधिकाऱ्यांच्या नावानीशी तक्रार करण्यात आली असून, त्यांच्यावर कडक कारवाई झाली तरच सावकारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी यासंदर्भात बैठक घेणार असून, दोषी आढळलेल्या एआरवर निश्चितच कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश शेळके, शंतनु पाटील यांच्यासह राकाँचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सावकारांना पाठिशी घालणारे अधिकारी व शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकारांवर कारवाई केली नाही तर सावकारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.