अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
By Admin | Updated: May 2, 2017 23:54 IST2017-05-02T23:54:40+5:302017-05-02T23:54:40+5:30
वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला.

अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
वडगाव तेजनजवळ अपघात : अज्ञात रेतीच्या वाहनाची धडक
वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाल्याची घटना २ मे रोजी सकाळी वडगाव तेजनजवळ घडली.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे (४५) व संगीता संजय चौथे (३५) हे पती-पत्नी दोघे एम.एच.२८ क्यू. १३६० या मोटारसायकलवरून लोणारकडे सावडण्याच्या कार्यासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन हे रेतीचे असल्याचे समजते. हे वाहन लोणारकडून रेती घेऊन मेहकरकडे जात होते. मोटारसायकल व रेती वाहन यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून लोणार पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. या रोडने रेती वाहतूक करणारी वाहने जोरात धावतात, त्यामुळे मोटारसायकलस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वेगाची मर्यादा बांधून देण्यात यावी, तसेच रेतीचे वाहन रस्त्याने जात असताना ती पूर्णपणे झाकलेली असावी, अन्यथा रेतीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यामध्ये जावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायपूर गावावर शोककळा
पिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती - पत्नीचा लोणार गावाजवळ अज्ञात वाहनाने-मोटारसायकलच्या धडकेत बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे, पत्नी संगीता संजय चौथे हे सुलतानपूर गावाला रक्षाविसर्जनासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ या दोघावर काळाने झडप घातली व दोघे जागेवरच ठार झाले. चौथे कुटुंबाचे गावोगावी जावून स्टील भांडी विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.त्यांच्या पश्चात अश्वीनी चौथे (२० वर्ष), पल्लवी चौथे व दहा वर्षाचा मुलगा हर्षल चौथे असे तीन मुले आहेत.
लहान मुलगा एसटीने गेल्याने प्राण वाचले
दहा वर्षीय मुलगा हर्षल त्यांच्यासोबतच चिखलीपर्यंत होता; परंतु मुलाने मामाच्या घरी जालना येथे जाण्याचा हट्ट धरल्याने त्याला चौथे कुटुंबीयाने जालन्याच्या एसटी बसमध्ये बसून ते सुलतानपूरसाठी रवाना झाले; परंतु रस्त्यानेच त्यांच्यावर काळाने झडप घातली. घरातल्या दोन्ही कर्त्या व्यक्ती गेल्याने या लहान मुलांवर संकट कोसळले आहे.