पैनगंगेच्या पुराने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST2021-09-09T04:42:30+5:302021-09-09T04:42:30+5:30

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ...

Crops damaged by Pangange floods | पैनगंगेच्या पुराने पिकांचे नुकसान

पैनगंगेच्या पुराने पिकांचे नुकसान

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा पूल देखील क्षतीग्रस्त झाला आहे. या नुकसानाची माहिती घेतल्यानंतर आ. श्वेता महाले यांच्या सूचनेवरून भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी आदी अधिकारी वर्ग समवेत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाडळी, गिरडा, इजलापूर, गोंधनखेड, मढ, अटकळ, देवपूर आदी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा क्षतीग्रस्त पुलाबाबत जि. प. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना देऊन तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ॲड .देशमुख यांनी यावेळी केली. यावेळी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा किसान मोर्चाचे आनंदा डुकरे, संजय झुंबड, कुंदन गायकवाड, संतोष पाटील, रमेश भोपळे तसेच स्थानिक भाजपा शाखा अध्यक्ष व सहकारी उपस्थित होते.

पीक विमा संदर्भातील कागदपत्रे तातडीने द्या !

शेतीच्या नुकसान भरपाईतून काही प्रमाणात पीकविम्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासाठी नुकसानाची माहिती ७२ तासांच्या आत देणे गरजेचे ठरते. त्यानुसार नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असल्यास ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती अर्ज करून तसेच नुकसान झालेल्या शेताचे फोटो जोडून कृषी अधिकारी व विमा कंपनीला सादर करावे, असे आवाहन या पाहणी दरम्यान ॲड. सुनील देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले.

Web Title: Crops damaged by Pangange floods