कापसाचा पेरा वाढणार !
By Admin | Updated: May 15, 2014 00:39 IST2014-05-15T00:35:58+5:302014-05-15T00:39:13+5:30
सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व मिळालेला भाव यामधील तफावत पाहता कपाशी पिकाकडे शेतकर्यांचा कल असेल

कापसाचा पेरा वाढणार !
संग्रामपूर : मान्सूनपूर्व पीक नियोजनामध्ये तालुका कृषी विभागाकडून सोयाबीनचा पेरा वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व हातात मिळालेला भाव यामधील तफावत पाहता या भागात ऐनवेळी कपाशी पिकाकडे शेतकर्यांचा जास्तीचा कल असेल अशी जाणकारांमधून चर्चा होत आहे. तर भेंडवळ मांडणीमध्ये पावसाचे भाकीत पाहता यंदाचे वर्ष ही शेतकर्यांसाठी फटका देणारे ठरणार का? अशी चिंताही व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप पिकाच्या पेरणीचा अहवाल नुकताच तयार केला. त्यामध्ये कपाशीचा पेरा घटणार अशी शक्यता दाखवली. परंतु हा अंदाज उलट होण्याची लक्षणे आतापासून बाजारातील शेतकर्यांच्या चर्चेवरून दिसत आहेत. गेल्या हंगामात पावसाने कहर केल्याने कपाशीसह सोयाबीन पिकाला फटका बसला. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने बर्याच सोयाबीनची गुणवत्ता बिघडली. परिणामी अशा गुणवत्ता घसरलेल्या सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळाले. सुरूवातीला २७00 रूपयांपासून तर तीन हजार रूपये क्विंटलने विक्री झालेले सोयाबीन सर्वाधिक होते. त्यानंतर बाजारात तेजी आली मात्र याचा फायदा साठवणुकदारच घेऊ शकले. यामध्ये शेतकर्यांकडे साठवण क्षमता नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने सोयाबीनमध्ये आर्थिक बजेट लागला नाही. कपाशीमध्ये कोरडवाहू शेतकरीही बरे प्रमाणात उत्पादन घेऊ शकले. कारण नंतरचा पाऊस हा कपाशीसाठी पोषक ठरल्याने फर्दळने अनेकांचा आर्थिक फायदा करून दिला व फर्दळ चार हजार रूपयांचेवर भाव देऊन गेल्याने सोयाबीन पेरणी करणारा पश्चाताप करताना दिसत होता. म्हणूनच यंदाच्या हंगामात निव्वळ सोयाबीनच्या नांदात अडकल्यापेक्षा कपाशी पेरलेली बरी, हाच विचार प्रत्येकाच्या मनात येत असल्याचे दिसत आहे. परंतु कृषी विभागाने गत वर्षीच्या हंगामानुसार काढलेला अंदाज सोयाबीन पिकावर भर देणारा ठरत आहे. त्यामध्ये ४४ हजार ७00 हेक्टरपैकी कपाशी १३ हजार ३६२ हेक्टर, सोयाबीन १७ हजार ५४१ हेक्टर, ज्वारी ३ हजार हेक्टर, मका १८00 हेक्टर, तूर ३ हजार ६00 हेक्टर, मुंग ३ हजार ३00 हेक्टर, उडीद २ हजार हेक्टर तर बाजरी पूर्णत: बाद दाखविण्यात आली आहे. या अंदाजाला सोयाबीनच्या बियाण्याची वाढीव किंमत मोठा अडथळा ठरू शकते. कारण ३0 किलो सोयाबीन ज्यांनी ९00 रूपयात विकले तेच ३0 किलो २७00 रूपयात मिळत असल्याने ऐनवेळी निर्णय बदल होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या एका बॅगमध्ये जेवढे क्षेत्र पेरणी होते त्यापेक्षा जास्त क्षेत्र कपाशीचे होते. तेवढय़ाच पैशात व खतासह असा आर्थिक बजेट लक्षात घेता कपाशी पिकाचा पेरा वाढण्याचा अंदाज जाणकारांचा आहे. सोबतच यंदाची नैसर्गिक स्थिती लक्षात घेता कपाशी पिकाकडे वळणार्यांची संख्या वाढणार आहे.