केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करीत असून, या सरकारला देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार यांचे काही देणे -घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून, काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनांच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचीही लूट सुरूच आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी १६ जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार असल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले. या आंदोलनात बुलडाणा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST