मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
By Admin | Updated: April 20, 2017 00:02 IST2017-04-20T00:02:29+5:302017-04-20T00:02:29+5:30
खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
खामगाव : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले; मात्र या आंदोलनाचा काहीच उपयोग न झाल्याने, बुधवारी सकाळी काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर खामगाव पालिकेतील राजकारण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचल्याची चर्चा होत आहे.
येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाची मुख्याधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे धडक दिली. सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्याधिकाऱ्यांची तक्रार केली. यामध्ये खामगाव नगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला. पालिकेत बहुमताच्या जोरावर नियमबाह्य आणि गैरकायदेशीर ठराव पारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद असून, मुख्याधिकारी राजकीय दबावातून सत्ताधाऱ्यांनी मनमानी खपवून घेत असल्याचे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी तक्रारीत नमूद केले आहे.
चौकशीचे आश्वासन
पालिकेतील गैरकाराभाराची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस-आघाडी नगरसेवकांना दिल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारासह मुख्याधिकाऱ्यांचीही तक्रार काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. या तक्रारीवर काँग्रेस आघाडीच्या १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत.