गोहत्या बंद करून रामराज्य आणा
By Admin | Updated: December 22, 2014 00:42 IST2014-12-22T00:42:06+5:302014-12-22T00:42:06+5:30
सुवर्ण जयंती महोत्सव : बालयोगी सरस्वती यांचे आवाहन.

गोहत्या बंद करून रामराज्य आणा
हिवराआश्रम (ता मेहकर, जि. बुलडाणा) : महाराष्ट्रात सर्वांत जास्त संत निर्माण झाले. संतांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात असूनदेखील आज महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात दुष्काळ पडताना दिसत आहे. याचे कारण गोहत्याचे प्रमाण; महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आहे. गोहत्या बंद करुन रामराज्य आणा, असे आवाहन बालयोगी सरस्वती यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवादरम्यान केले.
गोहत्यासंबंधीचे विचार आज संत महात्म्यांनादेखील मंचकावरून व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी गोवंश वाढवा, गौशाळा काढा. गोहत्या टाळल्यास येथील भूमी स्वर्ग बनेल, असेही बालयोगी सरस्वती यांनी सांगितले. हिवराआश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात हिंदू संमेलनास जमलेल्या हजारो हिंदू बांधवांच्या समोर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज होते, तर परम् श्रद्धेय बालयोगी सरस्वती, महामंडलेश्वर अखिलेश महाराज गिरी, दादासाहेब वेदक यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्माचे रक्षण करा, धर्म आपले रक्षण करेल. आज धर्माच्या रक्षणार्थ कार्य करण्याची वेळ आली असून, आज धर्मांतर नाही, तर घर वापसी कार्य होत असल्याचे अखिलेश महाराज गिरी यांनी सांगितले. ५0 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा आढावा व धर्मासंदर्भात पुढील करावयाच्या कार्यासंबंधीचे विवेचन त्यांनी केले.
गोरक्षणाच्या कार्याबद्दल मेहकर येथील विजय पवार यांचा बालयोगी सरस्वती यांच्या हस्ते तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील गावांतून सुमारे ५0 दिंड्यांनी आपली हजेरी लावली होती.