कंपनीच्या कार्यालयावर धडकले नागरिक
By Admin | Updated: May 4, 2017 00:30 IST2017-05-04T00:30:32+5:302017-05-04T00:30:32+5:30
मेहकर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, फर्दापूर येथील वीज पुरवठा खंडित होत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

कंपनीच्या कार्यालयावर धडकले नागरिक
मेहकर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, फर्दापूर येथील वीज पुरवठा खंडित होत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे फर्दापूरवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. संतप्त झालेले फर्दापूरवासी २ मे च्या रात्री वीज कंपनीच्या कार्यालयावर धडकले होते.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. मेहकर तालुक्यातील ५१ गावात तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. महिला पाण्यासाठी दिवसभर वणवण भटकत आहेत. काही गावात विहीर अधिग्रहित केल्या आहेत, तर काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तसेच फर्दापूर येथे कूपनलिका अधिग्रहित केलेल्या आहेत. या कूपनलिकेवरून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु गेल्या आठ दिवसांपासून फर्दापूर येथील वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने गावकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिलांना दिवसभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी सरपंच पती विठ्ठल मिस्कीनसह गावकरी दररोज वीज कार्यालयात चकरा मारत आहेत. संबंधित कार्यालयात अधिकारी तथा कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत. वीज पुरवठा खंडित होत असल्याने गावकरी पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोठेही विद्युत वितरण कंपनीकडून अधिकृतरीत्या भारनियमन असल्याचे सांगण्यात येत नाही. असे असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असतो. बऱ्याच गावामध्ये उन्हाळी पिके घेतली जातात. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांवरसुद्धा परिणाम होत आहे. यापेक्षा पाणी पुरवठ्याच्या योजना प्रभावित होत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना जाब विचारू शकत नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या या संयमाचा फायदा घेत अधिकारी मनमानीप्रमाणे वागत असल्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारनियमन नसताना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारण काय, याचा जाब विचारण्यासाठी आता गावकरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
फर्दापूरवासी रात्रीच धडकले वीज कार्यालयावर
कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसभर वणवण भटकावे लागत आहे. फर्दापूर येथे थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे; परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. गेल्या आठ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने गावकरी त्रस्त झाले असून, संतप्त गावकरी २ मे च्या रात्री मेहकर येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडकले; मात्र कार्यालयात कोणीच जबाबदार अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे विठ्ठल मिस्कीन, राजू मिस्कीन, रवि मिस्कीन, रमेश गाडेकर, अनिल जाधव, डिगांबर गाडेकर, रमेश दहातोंडे, गणेश मोसंबे, अमोल गाडेकर, संजय गाडेकर तक्रार देण्यासाठी मेहकर पोलीस स्टेशनला गेले होते; परंतु पोलिसांनी तक्रार न घेता गावकऱ्यांना परत पाठवले.
लाइनमन व अभियंत्यावर कारवाई व्हावी
उन्हाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी पंचायत समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत; परंतु वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. फर्दापूरचे लाइनमन यांचे फर्दापूरकडे नेहमीच दुर्लक्ष असते. तर शाखा अभियंता यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत आहेत. आठ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असताना व त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत असताना लाइनमन व शाखा अभियंता कोणत्या कामात गुंग आहेत, हे कळेनासे झाले आहे. लाइनमन व शाखा अभियंता यांच्या निष्काळजीमुळे गावकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याने लाइनमन व शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फर्दापूरवासीयांनी केली आहे.