ईसाई येथील हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना अटक
By Admin | Updated: June 13, 2017 00:03 IST2017-06-13T00:03:43+5:302017-06-13T00:03:43+5:30
बऱ्हाणपूर येथून केली अटक : १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

ईसाई येथील हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील आदिवासी ग्राम ईसाई या ठिकाणी नवविवाहिता शर्मीला वास्कले हिचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सासरकडील तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ) व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. यातील मृत महिलेचा पती सुरेश वास्कले यास पोलिसांनी अटक केली होती. तर यातील दोन फरार आरोपींना १० जून रोजी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे पकडण्यात आले व जळगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
यामध्ये मृत महिलेची सासू मालीबाई वास्कले (वय ४०) व सासरा जामसिंग वास्कले (वय ४२) या दोन आरोपींचा समावेश आहे. या दोन्ही आरोपींना ११ जून रोजी जळगाव जामोद न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर आरोपींना अटक करावी, यासाठी ९ जून रोजी जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर मृताच्या आई, वडील, नातेवाईक तथा वसाळी येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते.