केंद्र सरकारने विश्वास संपादन केला - पात्रा
By Admin | Updated: May 30, 2015 02:27 IST2015-05-30T02:27:07+5:302015-05-30T02:27:07+5:30
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांची बुलडाणा येथे पत्रकार परिषद.

केंद्र सरकारने विश्वास संपादन केला - पात्रा
बुलडाणा: विकासाला केंद्रबिंदू मानून केंद्रातील मोदी सरकारने मागील एक वर्षात केलेल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला, त्याबरोबरच मागील एनडीए सरकारने केलेले घोटाळे व भ्रष्टाचारातून देशाला मुक्ती मिळविण्यासाठी केलेले काम हे या सरकारची उपलब्धी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना घोटाळेबाज सरकारने देशाचे वाटोळे केल्याचा आरोपही केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा बुलडाणा येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पात्रा म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर वर्षभरात एकही घोटाळा झाला नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली, परिणामी जगात देशाची छबी उजळून निघाली. स्वातंत्र्याच्या ६0 वर्षात ६0 टक्के जनता बँक प्रणालीच्या बाहेर होती. मोदी सरकारने एका वर्षात जनधन योजनेच्या माध्यमातून १५ कोटी लोकांचे बँक खाते उघडून आर्थिक समानता निर्माण केली. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील २0 टक्के लोकांनाच विमा मिळत होता. आता ७ कोटी लोक विमा योजनेत सहभागी झाले, ही अच्छे दिनची सुरूवात असल्याचा दावा त्यांनी केला. परदेशातील काळेधन असलेल्यांची नावे आता प्रसिद्ध होऊ लागली आहेत. लवकरच काळेधनसुद्धा परत येईल. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलणे टाळत ते म्हणाले की, पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मत व त्यांचा निर्णय हा अंतिम आहे. या विषयावर आपण अधिक बोलणार नाही. भाजप छोट्या राज्याचे सर्मथक आहे, यावर त्यांनी मात्र संमती दर्शविली. नेपाळचा भूकंप असो की काश्मीरचा महापूर असो, घटनेच्या काही तासात पीडिताना मदतीचा हात देण्याचे काम सरकारने केले. मोदी सरकारची विदेश नीती, केंद्र व राज्य सरकारातील समन्वय, मंत्री व पंतप्रधान यांच्यातील संवाद यामधून सरकारला चांगली कामे करता आली. त्यातूनच केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा विश्वास संपादन केल्याचा दावा पात्रा यांनी केला. पत्रकार परिषदेला आ. चैनसुख संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे, भाजप नेते योगेंद्र गोडे उपस्थित होते.