बुलडाणा जिल्ह्यात वीस वर्षांपासून भूमापन नाही
By Admin | Updated: January 22, 2015 00:36 IST2015-01-22T00:36:03+5:302015-01-22T00:36:03+5:30
बुलडाणा जिल्ह्यात १९९४ मध्ये झाले होते ११३ गावांचे भूमापन.

बुलडाणा जिल्ह्यात वीस वर्षांपासून भूमापन नाही
नीलेश शहाकार /बुलडाणा :
राज्यात १९६४ पासून भू-मापन प्रक्रिया सुरु आहे. यानुसार १९९४ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ११३ गावांचे अत्यंत क्लिष्ट पद्धतीने भू-मापन करण्यात आले; मात्र गेल्या वीस वर्षांंनंतरही जिल्ह्यातील एकूण गावांपैकी १ हजार १८१ गावांचे अद्यापही भू-मापन झाले नसल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ व १२६ नुसार भूमापन मोजणी करण्यात येते. ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका स्तरावर ही प्रक्रिया राबविण्यात येत असते. यातून स्थानिक नागरिकांना जागेचा मूळ अभिलेख प्राप्त होऊन नझूल आकारला जातो. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामसभेत भू-मापनाचा ठराव घ्यायचा असतो. सदर ठराव ग्रामपंचायतीतून मंजूर होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे जातो. त्यास मंजुरात देऊन जिल्हाधिकारी आदेश काढून भूमिअभिलेख विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवितात; मात्र भूमापनाची ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. ही प्रक्रिया दीर्घकाल सुरु राहते.
बुलडाणा जिल्ह्यातील १९९0 नंतर भूमिअभिलेख कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्याचा विस्तार कमी असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये भूमापन प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र आज बर्याच गावांची लोकसंख्या वाढली आहे. शिवाय मूळ जमिनीचे मोठय़ा प्रमाणात पोटविभाजन झाले. ही बाब गावठाणाच्या पुनर्मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करीत आहे. शासनाने दिलेल्या नवीन आदेशानुसार अद्ययावत प्रणालीच्या आधारे उपग्रहाद्वारे भूमापन कार्यक्रम राबविला जाणार आहे, यासाठी लवकरच जिल्ह्यात प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे सहायक प्रवीण पांडे यांनी राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जमिनीची पुनर्मोजणी व भूमापन सुरु असल्याचे स्पष्ट केले. प्रक्रिया क्लिष्ट असल्यमुळे भूमापनाला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असेही ते म्हणाले.
शासनाच्या आदेशानुसार २00१ पासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय भूमापन अधिकारी यांच्याकडे किमान एक गावाचे भूमापन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर निघालेल्या नवीन आदेशानुसार २0११ पासून प्रत्येक अधिकार्याकडे आणखी एक गाव जोडण्यात आले; मात्र या भूमापन कामाला गती मिळाली नसल्यामुळे उद्दिष्टपूर्ती झाली नाही.
*कमी कर्मचार्यांमुळे अडचण
जिल्ह्यातील गावठाणचे भूमापन कामासाठी जिल्हास्तरीय अधिकारी व्यतिरिक्त तालुकास्तरावर हे अधिकारी काम करतात; मात्र १३ तालुक्यांपैकी केवळ ७ ठिकाणी तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, त्यामुळे गावठाणाचे भूमापन करणे, मोजमाप झाल्यानंतर त्याबाबत चौकशी पुरावे गोळा करण्याच्या कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.