तुटलेल्या रस्ता दुभाजकाचा ‘धोका’ कायम
By Admin | Updated: May 22, 2014 23:40 IST2014-05-22T22:51:06+5:302014-05-22T23:40:14+5:30
बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा शहरानजीकच्या रस्ता दुभाजकाची संपूर्ण दुरवस्था झाली आहे.

तुटलेल्या रस्ता दुभाजकाचा ‘धोका’ कायम
मोताळा : बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा शहरानजीकच्या रस्ता दुभाजकाची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या परिस्थितीकडे यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. शहरानजीकच्या दोन्ही महत्वपूर्ण रस्ता दुभाजकाचे तीन तेरा झाले असून रस्ता दुभाजक दर्शविणारे फलकही बेपत्ता आहेत. यामुळे एखाद्या मोठय़ा दुर्घटनेची शक्याता बळावली असून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष प्रवाशांच्या जिवावर बेतण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोताळा शहरात प्रवेश करतेवेळी व बसस्थानकासमोर असलेले दोन्ही रस्ता दुभाजक गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण तुटलेले आहेत. मात्र संबधित विभागाला जाग आली नसल्यामुळे तुटलेल्या या दोन्ही रस्ता दुभाजकांवर येणारी-जाणारी वाहने धडकतच असल्यामुळे सद्यस्थितीत दोन्ही दुभाजक जमीन दोस्त झाली आहेत. या ठिकाणी गंभीर जीवघेणी घटना जरी झाली नाही तरी अनेक लहान-मोठया दुर्घटना होवून वाहनांचे व नागरिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. सद्या उन्हामुळे रात्री-बेरात्री प्रवास करणार्यांची संख्या वाढलेली आहे. शहरातून बुलडाणा-मलकापूर व नांदुर्याकडे जाण्या-येण्यासाठी या ठिकाणावरूनच वाहनधारकांना जावे लागते. शहरालगतच्या बोराखेडी जवळ शहरात प्रवेश करतेवेळी दोन ठिकाणी गतीरोधक तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी गतीरोधक व गतिरोधक दर्शविणारे फलक लावले गेले नाहीत. गतिरोधकावर पांढरे पटटे्सुद्धा मारले गेले नसल्यामुळे अनेक दुर्घटना होत आहेत. बुलडाण्याकडून शहरात येतांना वाहन धारकांना अंदाज न येणारे हे दोन गतीरोधक पार करावे लागतात व गतीरोधक पार केल्यानंतर लगेचच तुटलेला रस्ता दुभाजकाचा सामना करावा लागतो. पूर्वी गतीरोधक नव्होते तेंव्हा वाहने सरळ तुटलेल्या रस्ता दुभाजकावर आदळायची,आता भरधाव वाहने विना फलकाच्या दोन्ही गतिरोधकावर प्रथम आदळतात व नंतर लगेचच समोरच्या तुटलेल्या रस्ता दुभाजकावर आदळतात. असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावरील अश्या दुरवस्थेकडे पाहण्यासाठी संबधित विभागाला वेळ मिळत नसल्याची बाब अतिशय गंभीर असून संबधित विभागाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जिवावर कें व्हांही उठु शकतो. सद्यस्थीतीत शहरानजीकचे दोन्ही रस्ता दुभाजक महत्वाचे असून तातडीने त्यांची दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. या बरोबरच वाहनधारकांना अंदाज येण्यासाठी योग्य त्या ठिकाणी रास्ता दुभाजक, गतिरोधक व गतिरोधक दर्शविणारे व वाहनधारकांना कल्पना देणारे फलक ठळक स्वरूपात लावणे आवश्यक झाले आहे.