बुलडाण्यात जोरदार पाऊस, पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 17, 2017 03:30 IST2017-03-17T03:30:18+5:302017-03-17T03:30:18+5:30
संत्रा, आंब्यासह फळबागांचे नुकसान : शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला

बुलडाण्यात जोरदार पाऊस, पिकांचे नुकसान
बुलडाणा, दि. १६- मोताळा, चिखली, शेगाव, खामगाव, मेहकर तालुक्यांसह जिल्ह्यात गुरुवारी दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकर्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. सध्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा व गव्हाचे पीक आहे. हरभर्याचे पीक सध्या काढणीला आले आहे. अनेक शेतकर्यांनी शेतात तुरीची सोंगणी करून गंजी लावून ठेवली आहे. पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी चांगल्या पिकाची अपेक्षा शेतकरी करीत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. जिल्ह्यात असलेल्या फळबागांनाही पावसाचा फटका बसला आहे. संत्रा गळून पडला असून, आंब्याचा मोहरही गळला आहे. त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकरीही संकटात सापडले आहेत. गुरुवारी अचानक आलेल्या या पावसामुळे बुलडाणा शहरात रस्त्यावर दुकाने थाटणार्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. भाजीपाला उत्पादकांचा माल भिजल्यामुळे त्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. तसेच शहरात ठिकठिकाणी डबके साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागला.