आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’
By Admin | Updated: July 25, 2015 01:25 IST2015-07-25T01:25:20+5:302015-07-25T01:25:20+5:30
महसूल व वन विभागाचा निर्णय ; शेतक-यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम.

आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’
मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा): गत तीन वर्षातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे उत्पादन घटुन शेतकर्यांच्या डोईवर कर्जाचा भार वाढतच आहे. दुष्काळातील जगणे सुसह्य झालेल्या शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असून, गत तीन वर्षात सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांचा आत्महत्येचा वारू बेफाम आहे; शेतकर्यांच्या आत्महत्येवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागाने २४ जुलै रोजी घेतला आहे. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरिता शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबविल्या जात आहेत; मात्र शेतकर्यांच्या आत्महत्येला काही ब्रेक लागलेला नाही. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला असून, राज्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्येने ग्रासलेल्या शेतकर्यांचे मनोबल उंचावून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याकरिता जिल्हास्तरीय समित्या, ग्रामस्तरीय समित्या निर्माण करून बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येणार असून, सुरुवातीला विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, त्यानंतर राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. सततच्या नापिकीमुळे वाढत्या कर्जापायी आलेल्या नैराश्येने कंटाळून राज्यातील शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियान राज्यभरातील आत्महत्या होणार्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता पथदश्री प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्याकरिता ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून यादी बनवून गावात शेतीविषयक शासकीय योजना कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे. गावात सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तन, पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय सेवेत समुपदेशन करण्याचे नियोजन व उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत ठरावीक कालांतराने गावोगावी स्वास्थ शिबिरे आयोजित करून शेतकर्यांना मानसोपचार तज्ज्ञांची तसेच समाजसेवकांची सेवा शिबिरांमधून उपलब्ध करून देणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.