एक कलाकृती चिरंतन ठरू शकते
By Admin | Updated: January 19, 2015 02:14 IST2015-01-19T02:14:26+5:302015-01-19T02:14:26+5:30
बुलडाणा येथील विद्रोही साहित्य सम्मेलनात सर्जनशील लेखकांशी संवाद.

एक कलाकृती चिरंतन ठरू शकते
बुलडाणा : केवळ पुस्तकांची संख्या जास्त आहे म्हणून लेखक मोठा होत नाही, तर एक चांगली कलाकृतीही लेखकासाठी चिरंतन ठरू शकते. त्यासाठी लेखकांनी सकस, प्रगल्भ साहित्यनिर्मिती करावी, असे विचार रमेश इंगळे उत्रादकर यांनी मांडले. नामवंत सर्जनशील लेखकांशी एक संवाद या विषयावर रमेश इंगळे उत्रादकर आणि रवींद्र इंगळे चावरेकर यांच्याशी प्रा. सिद्धेश्वर नवलाखे यांनी संवाद साधला. भाषा निर्मितीवर भाष्य करताना रवींद्र इंगळे चावरेकर म्हणाले, व्याकरण हे भाषा निर्मितीचे शास्त्र होऊ शकत नाही. जी बोलतो, ती भाषा होते. त्यानंतर व्याकरणाची निर्मिती होते. संस्कृत ही ग्रंथभाषा आहे. ती व्यवहारात कोठेही कधीही वापरण्यात आली नाही. व्यावहारिक जगण्यासाठी भाषेचा फायदा होत नाही. बाराव्या शतकात मराठी भाषेचा जन्म झाला, असे सांगितले जात असेल, तर त्यापूर्वीचे लोक मुके होते काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तिच्या खोलात जाण्यास आम्ही कमी पडतो, अशी खंत चावरेकर यांनी व्यक्त केली. रमेश इंगळे उत्रादकर यांनी शब्दवेधची निर्मिती ते शब्दवेधची झालेली ताटातूट इथपर्यंतचा प्रवास उलगडला. ह्यशब्दवेधह्णने लिहिण्याची ऊर्मी वाढविण्याचे काम केले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निशाणी डावा अंगठा या त्यांच्या कादंबरीवर भाष्य केले.