मेहकर शहरात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:58+5:302021-04-25T04:33:58+5:30
मेहकर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध असताना, शहरवासीयांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ...

मेहकर शहरात कृत्रिम पाणीटंचाई
मेहकर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध असताना, शहरवासीयांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषदेने कमीतकमी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मेहकर शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २०११ नुसार लोकसंख्या ४५ हजारांपर्यंत असली, तरी सध्या ही संख्या ६० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसह इतर जिल्ह्यातील नागरिकही कामानिमित्त मेहकर शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेले आहेत. मेहकर शहराला कोराडी प्रकल्प व अनिकटवरील खुल्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. काेराडी प्रकल्पात सध्याही मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध आहे. सध्या शहरात दहा दिवसांआड दरडोई ७० लीटरप्रमाणे एक ते दीड तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोराडी प्रकल्पामध्ये शहरासाठी प्रतिवर्ष १़ ८६ दलघमी पाणी आरक्षित करण्यात येत असते़ १९९९ मध्ये शहराची नवीन पाणीपुरवठा ही कार्यान्वित करण्यात आली आहे. नगरपरिषदेने शहरात विविध भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून हात पंप व वीजपंप ही सुरू केले होते. मात्र, काही भागांतील हातपंप, वीजपंप पूर्णपणे बंद पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नगरपरिषदेने वाढती लोकसंख्या धोरणानुसार नवीन योजना तयार करून कमीतकमी तीन दिवस आड पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकले नाही.
आरओ प्लांट संचालकांची चांदी
मेहकर शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा हाेत असल्याने, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक जण आरओ प्लांटवरील पाणी विकत घेत आहेत. अनेकांकडे दहा दिवस पुरेल, एवढे पाणी साठवून ठेवण्याची साेय नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे.