दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’!
By Admin | Updated: May 1, 2017 23:25 IST2017-05-01T23:25:31+5:302017-05-01T23:25:31+5:30
संपूर्ण दारुबंदीचा ठराव : महाराष्ट्रदिनी झालेल्या ग्रामसभांमध्ये गावकऱ्यांचा निर्णय

दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’!
बुलडाणा : महाराष्ट्रदिनी १ मे रोजी जिल्हाभरातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेत गावातील महिलांनी शंभर टक्के उपस्थित राहून गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी एल्गार केला. शिवाय दारुबंदीसाठी एकमुखाने ठराव पारित करून घेतला. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी जोरदार पाठिंबा दर्शविला.
दारुबंदीसाठी रॅली
डोणगाव: दारू विक्रीनंतरही गावातील काही दुकानदारांनी ग्रामपंचायतीकडे देशी दारूची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महाराष्ट्र दिनाच्या पुवसंध्येला दारूबंदी विरुद्ध गावातून भव्य रॅली काढून जनजागृती केली, तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रदिनी झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा ठराव घेऊन यापुढे डोणगाव परिसरात कोठेही दारू विकल्या जाणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे सदर ग्रामसभा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात झाली. गावकऱ्यांच्यावतीने विनोद बोंडगे यांनी संपूर्ण दारूबंदीचा ठराव मांडला, तर, या ठरावाला उपस्थित महिला-पुरुषांनी एकमताने अनुमोदन देत बहुमतात हा ठराव पास झाला. याशिवाय याच ग्रामसभेत रमेश परमाळे व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळावा, शेतकऱ्यांची तूर नाफेड मार्फत खरेदी करण्याबाबत, कृषी पंपाचे वीजबिल माफ करावे, सोयाबीनचे अग्रिम बोनस मिळावे, आदी मागण्यांचे ठराव मांडले. येथे मंजूर करण्यात आलेली पेयजल योजना सन २०१६ पर्यंत पूर्णत्वास जाऊन डोणगावला पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते; परंतु अद्यापपर्यंत योजना पूर्ण झाली नाही. योजनेच्या कामाची चौकशीची मागणी करण्यात आली. दारूबंदी व पाण्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले.
दारूबंदीसाठी ठाणेदार शिंदे यांना घेराव
सध्या डोणगाव येथे ग्रामीण भागातून देशी दारू आणून ती विकल्या जाते. या दारूविक्रीला पोलिसांचा खुलेआम पाठिंबा आहे. या अवैध दारूविक्रीवर महिला आक्रमक होऊन त्यांनी ठाणेदार आकाश शिंदे यांना घेराव घातला. वारंवार तक्रारी करूनसुद्धा अवैध दारू विक्री बंद का होत नाही, असा सवाल उपस्थित करून या महिलांनी ठाणेदारावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर ठणेदारांनी त्वरित दारु पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.
उंद्री : एकमुखाने दारुबंदीची मागणी
येथील ग्रा.पं.समोर १ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत महिलांनी एकमुखाने २६ मागण्या असलेला ठराव पारित करुन घेतला. यामध्ये गावात दारुविक्री बंदीची मागणी लक्षणीय ठरली. दारू दुकान व अन्य दुकानांना नाहरकत देणार नाही. दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, या महत्त्वाच्या मागण्या या ठरावात पारित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम तर जनतेने एकदम ग्रामसेवक यांना अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली; मात्र ग्रामसेवक यांनी प्रश्नाची उत्तरे दिली नाही. यामध्ये दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेमार्फत केलेल्या आंदोलनाला अद्याप यश आले नाही आणि प्रहारचे कार्यकर्ते यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता, त्यांना एक महिना थांबण्यास सांगितले; मात्र जनतेने दिव्यांगांच्या मागण्यांकडे चांगलेच लक्ष वेधले आणि ठरावात दोन मागण्या दिव्यांगांच्याही घेतल्या, यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक मागण्या या ठरावात घेण्यात आल्या आहेत; मात्र जनतेच्या २६ मागण्या १५ दिवसात मार्गी न लागल्यास कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय नेते व जनतेने दिला आहे. यावेळी संजय राऊत, संतोष ओवाळकर, मनोज लाहुडकार, सागर गायगोय व अनेक नेते व नागरिक या ग्रामसभेत उपस्थित होते.