आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:07 IST2017-04-26T00:07:07+5:302017-04-26T00:07:07+5:30
संग्रामपूर: निमखेडी या आदिवासीबहुल खेड्यात मध्यप्रदेश पोलीस आणि देशी कट्टा बनविणाऱ्या सूत्रधारामध्ये चकमक घडल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती.

आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे पथक रवाना
पोलीस-आरोपी चकमक प्रकरण
संग्रामपूर: तालुक्यातील निमखेडी या दुर्गम आदिवासीबहुल खेड्यात मध्यप्रदेश पोलीस आणि देशी कट्टा बनविणाऱ्या सूत्रधारामध्ये चकमक घडल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती. दरम्यान, या चकमकीत आरोपी त्रिलोकसिंग सुलतानसिंग हा देशी कट्टा बनवणारा मुख्य सूत्रधार फरार होण्यात यशस्वी झाला होता. या फरार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिनसिंह परदेशी यांच्यासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक आदिवासी दुर्गम भागातील अंबाबरवा, चिचारी, निमखेडी या आदिवासी भागातील गावात आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.
गत काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खंडवा पोलिसांनी बुऱ्हाणपूर-इंदूर बसमध्ये प्रवास करणाऱ्या युवकाकडून ८ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केल्याची कारवाई केली होती. दरम्यान, या युवकाला खंडवा पोलिसांनी अटक केल्यानंतर या युवकाने संबंधित पिस्तूल बनवण्याचे काम संग्रामपूर तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या पाचोरी गावात होत असून, यामध्ये देशी पिस्तूल बनवणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग असल्याची माहिती खंडवा पोलिसांना अटक करण्यात आलेल्या युवकाने दिली. युवकाने दिलेल्या या माहितीवरून खंडवा पोलिसांची चमू चारचाकी वाहनाने २४ एप्रिल रोजी पाचोरी येथे दाखल झाली व पाचोरी येथून या प्रकरणातील आणखी ३ आरोपींना खंडवा पोलिसांनी पाचोरी येथून अटक केली.
दरम्यान, खंडवा पोलीस या चार आरोपींना सोबत घेऊन पाचोरी येथून खंडवा येथे जात असताना त्यांना या प्रकरणातील देशी कट्टा बनविणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग हा संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे असल्याची माहिती खंडवा पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून खंडवा पोलिसांनी त्याच्याकडील गाडी संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी गावाकडे वळवली व निमखेडी येथे जात असताना निमखेडी गावात एका जमावामध्ये देशी कट्टा बनविणारा मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंग सुलतानसिंग दिसून आला; मात्र आपल्याला पोलीस अटक करण्यास आल्याची भनक लागताच त्रिलोकसिंगने पळ काढला.