राणीच्या बागेत अस्वल आले पण चिमुकलीच्या सतर्कतेने दुर्घटना टळली
By निलेश जोशी | Updated: May 9, 2023 15:07 IST2023-05-09T15:06:32+5:302023-05-09T15:07:48+5:30
सुदैवाने यावेळी कुठलीही दुर्घटना घडली नाही.

राणीच्या बागेत अस्वल आले पण चिमुकलीच्या सतर्कतेने दुर्घटना टळली
बुलढाणा : शहरालगत मलकापूर मार्गावर किवा क्रीडा संकुलाकडे सकाळी किंवा सायंकाळी फिरण्यास जाणाऱ्यांना अस्वल आणि बिबट्याचे दर्शन ही अलिकडील काळातील नित्याचीच बाब बनली असली तरी आता अस्वलाने चक्क राणीच्या बागेत सोमवारी सायंकाळी विश्रांती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यावेळी कुठलीही दुर्घटना घडली नाही.
समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंच असलेले बुलढाणा शहर हे तिन्ही बाजूंनी जंगालने व्यापलेले आहे. पूर्वी जुन्या आरटीअेा कार्यालयासह अगदी रामगनररच्या भागत सुद्धा अस्वलाचे दर्शन यापूर्वी झालेले आहे. मात्र सिमेंटचे जंगल आता उभे रहाल्याने जंगलालगत मानवी वस्ती झाली आहे. त्यातूनच कधी कधी अस्वल, बिबट्या कधी कधी तडस बुलढाणा शहरात मानवी वस्तीलगत येत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर राणीच्या बागेत एका अस्वलाने सोमवारी सायंकाळी प्रवेश केल्याचे समोर आले.
संध्याकाळ असताना संगम तलावाच्या बाजूने तो राणीच्या बागेत शिरला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. सायंकाळी राणीच्या बागेत काही पर्यटक व लहान मुले खेळत होती. तशी घरी जाण्याची वेळही झाली होती. त्यावेळी एका चिमुकल्या मुलीने राणीच्या बागीते संगम तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळच असलेल्या स्केटींगच्या जागेलगत बघीतले. ही बाब तीन त्वरित तेथे छायाचित्र काढणारे छायाचित्रकार सुभाष देशमुख यांना सांगितली. त्यांनीही घटनेचे गांभिर्य पहाता बागेतील लहान मुलांसह नागरिकांना परत जाण्याचा सल्ला देत सुरक्षा रक्षकास याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकाने याची माहिती त्वरित रेस्क्यू टिमला दिली. मात्र तोवर बराच अंधार पडल्याने अस्वल नेमके कोठे गेले हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान प्रारंभी अस्वल बघितल्यानंतर सर्वांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वल जिल्हा उपवन संरक्षकांच्या कार्यालयानजीकच्या पट्ट्यातून निघून गेले असावे असे सांगण्यात येत आहे.
गस्त वाढवली
राणीच्या बागेत अस्वल आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरएफअेा अभिजीत ठाकरे तसेच वनविभागाचे बचाव पथक तेथे दाखल झाले. परंतू अंधार पडल्यामुळे अस्वल नंतर दिसले नाही. काळजी करण्याचे कारण नसले तरी राणीच्या बागेत येणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आले. मंगळवारी पहाटे पर्यंत सतर्कतेचा इशारा वनविभागाने यापार्श्वभूमीवर दिला होता. मात्र आता परिस्थिती पूर्ववत असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्यावर्षीही १६ जून २०२२ रोजी अस्वल चक्क जिल्हा उपवनसंरक्षकांच्या बंगल्यापर्यंत पोहोचले होते. सोबतच जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालय परिसरातच रेस्क्यू टिमचे वास्तव्य असते.