‘स्वाभिमान’ अंतर्गत ७0 एकर शेती वाटप
By Admin | Updated: June 6, 2015 00:53 IST2015-06-06T00:53:39+5:302015-06-06T00:53:39+5:30
१८ लाभार्थ्यांना मिळणार लाभ; पुढील वर्षासाठी चार कोटीची मागणी.

‘स्वाभिमान’ अंतर्गत ७0 एकर शेती वाटप
बुलडाणा : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात १८ लाभार्थ्यांना ७0 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. यावर शासनाने २ कोटी ७ लाख रुपये खर्च केला. मागासवर्गीय घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यातीलच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर कुटुंबीयांना शेतीचे वाटप केल्या जाते. कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी व या दारिद्रय रेषेखालील लोकांनाही समानतेची वागणूक मिळावी म्हणून शासन ही योजना राबविते. यामध्ये लाभार्थ्यास चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायतीची जमीन विकत घेऊन दिल्या जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान व ५0 टक्के बिनव्याजी कर्ज दिल्या जाते. या कर्जाची फेड १0 वर्षांसाठी आहे. तर कर्जाची परतफेड ही कर्ज मंजुरीनंतर २ वर्षाने सुरू होते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा, लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील व भूमिहीन शेतमजूर असावा, लाभार्थ्यांची वयोर्मयादा १८ ते ६0 वर्षापर्यंत असावी. शिवाय विधवा व परितक्ता यांना प्राधान्य देण्यात येते. यावर्षी या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ लाभार्थ्यांना २ कोटी ७ लाख रुपये किमतीची ७0 एकर शेतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. येत्या २६ जून या सामाजिक न्यायदिनी सदर लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप करण्यात येणार आहेत. पुढील वर्षासाठी ४0 प्रस्ताव मंजुरीस पात्र झाले असून, जवळपास चार कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.