३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By Admin | Updated: April 27, 2017 01:53 IST2017-04-27T01:53:02+5:302017-04-27T01:53:02+5:30
खरीप हंगामाची तयारी : कृषी विस्तार, पेरणीसाठी जनजागृती करणार!

३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नीलेश शहाकार - बुलडाणा
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. हंगामादरम्यान बी-बियाणे कोणते विकत घ्यावे, माती परीक्षण कसे व कुठे करावे, पेरणी केव्हा करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंदा कृषी विभागाकडून ३९१ कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, १०० टक्के पेरणीची उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून प्रभावी नियोजन करण्यात आले आहे.
यानुसार खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना कोठलीच अडचण येऊ नये, म्हणून यंदा काही प्रयोगशील शेतकऱ्यांची कृषिमित्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
दोन गावांमधून एका शेतकऱ्याची कृषिमित्र म्हणून नेमणूक करण्याबाबत खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदर शेतकरी मित्रांची निवड ग्रामपंचायतकडून झालेली असून, येत्या खरीप हंगामामध्ये त्यांच्याकडून कृषी विस्ताराचे कार्य करून घेण्यात येणार आहे.
कृषी विभागावरील ताण कमी होणार
खरीप हंगाम-२०१७ मध्ये प्रथमच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या कामांचा कृषी विभागावर पडणारा ताण काही अंशी कमी होण्यास मदत होईल; मात्र खरीप हंगाम-२०१६ मध्ये कृषिमित्र नसल्याने सदर कामे कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्यात आली होती.