३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

By Admin | Updated: April 17, 2017 00:32 IST2017-04-17T00:32:29+5:302017-04-17T00:32:29+5:30

अपघातास आमंत्रण : जिल्ह्यातील १६० एसटी बसलाच ‘स्पीड लिमिट’

317 buses out of 'Speed ​​Limit' | ३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

ब्रह्मानंद जाधव - बुलडाणा
हायवेवर सुसाट वेगाने धावणाऱ्या एसटी बसेसचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते; मात्र जिल्ह्यातील ४७७ एसटी बसेसपैकी केवळ १६० बसेसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले आहे. त्यामुळे ३१७ एसटी बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर धावतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण नसलेल्या बसेस अपघातास आमंत्रण ठरतात.
रस्त्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडतात. वेगावर नियंत्रण नसल्याने होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये खासगी वाहनेच नाही तर सुरक्षित प्रवासाची सदैव हमी देणाऱ्या एसटी बसही मागे नाहीत. हायवेवर सुसाट धावणाऱ्या एसटी बसेसला वेगमर्यादा नसल्याने एसटी बसेसच्या अपघाताच्या घटना घडतात. त्यासाठी आरटीओने शहरात आणि हायवेवर सुरक्षित वेगमर्यादा ठरवून दिली आहे. तसेच या वाहनांना वेग मर्यादा न ओलांडण्याची सक्ती केली आहे; मात्र अनेक वाहनचालक नियम पाळत नाहीत. एसटी बसने वेग मर्यादेचा नियम पाळावा याकरिता एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते. जिल्ह्यात सात ठिकाणी एसटी बसचे आगार आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद यांचा समावेश आहे. या सात आगारांतर्गत ४७७ एसटी बसेस शहरासह ग्रामीण भागात धावतात. या बसेसच्या भरवशावर दररोज हजारो प्रवासी निश्चिंत होऊन प्रवास करतात; मात्र यातील अर्ध्या बसेस ह्या जुनाट इंजीनवर धावतात. तसेच एसटी बसेसचा वेग नियंत्रणात रहावा, यासाठी बसला ‘स्पीड लिमिट’ बसविणे गरजेचे असताना जिल्ह्यातील ४७७ बसेसपैकी केवळ १६० बसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले असून, ३१७ एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात धावणाऱ्या ३१७ बसेसचे वेगावर नियंत्रण दिसून येत नाही.

वर्षातून एकदाच होते एसटीची तपासणी
सर्व एसटी बसेसचे इंडिकेटर्स, हेडलाइट चालू आहेत किंवा नाही याची नियमित तपासणी होत नाही. प्रत्येक महिन्याला काही बसेस प्रादेशिक परिवहन विभागातून तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील एसटी बसेस वर्षभरानंतर एकदाच आरटीओकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. त्यामुळे बसमध्ये काही त्रुटी आढळल्यास येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करून पुन्हा बस सोडली जाते. यातील बहुतांश बसेस तर तात्पुरत्या दुरुस्तीखालीच सुसाट धावत आहेत.

Web Title: 317 buses out of 'Speed ​​Limit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.