देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:27+5:302021-02-05T08:34:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगाव राजा : डिसेंबर २०२०मध्ये महाराष्ट्रात सुमारे ६३ हजार कोटी रुपयांची वीजग्राहकांकडे थकबाकी असून, सदरची थकबाकी ...

30 crore electricity bill in Deulgaon Raja sub-division exhausted! | देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगाव राजा : डिसेंबर २०२०मध्ये महाराष्ट्रात सुमारे ६३ हजार कोटी रुपयांची वीजग्राहकांकडे थकबाकी असून, सदरची थकबाकी न दिल्यास वीज खंडित करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच केली आहे. असे असले तरी देऊळगाव राजा उपविभागात वीज वितरण कंपनीचे चक्क ग्राहकांकडे तीस कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढीये यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक आहेत. यामध्ये कृषिपंपधारक १६ हजार ग्राहक आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४०० असून, घरगुती वीजग्राहक १६,५००, तर वाणिज्य ग्राहकांची संख्या दोन हजारांवर आहे. यामध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालयांची संख्या १४५ असून, यांच्याकडे सुमारे दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. थकबाकीदारांमध्ये देऊळगाव राजा शहरातील पोलीस स्टेशन दोन लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय दीड लाख रुपये, नगर परिषदेकडे पथदिवे पाच लाख, पाणीपुरवठा चार लाख रुपये, खडकपूर्णा धरणावरील पंप हाउसचे ११ लाख रुपये थकीत असून, लॉकडाऊन काळामध्ये महावितरण कंपनीला वसुलीदरम्यान शासकीय कार्यालयांकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक सहकार्य तसेच थकबाकीपोटी रक्कम मिळाली नसल्याचे वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले. याच बरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा यांच्याकडे एक कोटी रुपये, तर पथदिवे ४५ लाख रुपये एवढी थकबाकी आहे.

चौकट...

वीज वितरण कंपनीचा अल्टिमेटम

अशी परिस्थिती असली तरी कोरोनाकाळामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे उद्योग धंदे बंद असल्यात जमा होते. अशावेळी सर्वसामान्य वीजग्राहकांची वीजबिलामध्ये काही सूट मिळेल काय, अशी अपेक्षा असून, शेतकरीवर्ग, मजूर यांना शासनाकडून अपेक्षा आहेत. वीज वितरण कंपनीने टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याचा अल्टिमेटम डिसेंबरपर्यंतच होता. यानंतर वीजग्राहकांनी बिल न भरल्यास त्यांचे कनेक्शन तोडण्यात येईल, असा फतवा शासन दरबारी निघाल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.

Web Title: 30 crore electricity bill in Deulgaon Raja sub-division exhausted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.