१७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:14 IST2017-08-12T01:14:26+5:302017-08-12T01:14:34+5:30
मेहकर: स्वच्छ भारत अभियानात हलगर्जी करणार्या १७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शुक्रवारी दिला.

१७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: स्वच्छ भारत अभियानात हलगर्जी करणार्या १७ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शुक्रवारी दिला.
शासनाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन हा उपक्रम शहरी तथा ग्रामीण भागात युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे; परंतु स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यासंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावातील परिस्थिती शौचालय बांधकामाच्या बाबतीत बिकट आहे. त्यामुळे शासनाचा मूळ उद्देश सफल होताना दिसत नाही. स्वच्छ भारत मिशनच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणार्या जवळपास १७ गावच्या ग्रामसेवकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई होणार आहे. अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांना ११ ऑगस्ट रोजी दिल्या.
ग्रामीण भागातील प्रत्येक गाव हगणदरीमुक्त झाले पाहिजे, गाव तथा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहिले पाहिजे, यासाठी शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण करून त्याचा नियमित वापर झाला पाहिजे, यासाठी वेळोवेळी पंचायत समितीचे संबंधित कर्मचारी व ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शौचालय बांधकामासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. ११ ऑगस्ट रोजी स्थानिक पंचायत समितीमध्ये स्वच्छ भारत मिशन अभियान संदर्भात सर्व ग्रामसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, चोपडे, पाणीपुरवठा व पंचायतचे यादव, गटविकास अधिकारी आर.पी. पवार, सहायक गटविकास अधिकारी ए.एस. सानप आदी उपस्थित होते. यावेळी मेहकर तालुक्यातील शौचालयाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये काही गावांची स्थिती समाधानकारक असल्याचे आढळून आले. तर काही गावांमध्ये शौचालयाची कामे अर्धवट असल्याचे दिसून आले.
शासनाकडून वेळोवेळी निधी, जनजागृती, सक्ती विविध उपक्रम एवढे राबवूनसुद्धा शौचालयासंदर्भात उदासीनता दिसून आल्याने पिंपळगाव उंडा, पारडा, पारखेड, अकोला ठाकरे, विश्वी, चायगाव, जनुना, हिवराखुर्द, उटी, जवळा, खंडाळा, गजरखेड, घाटनांद्रा, विठ्ठलवाडी, बोथा, नायगाव देशमुख, देऊळगाव साकर्शा, सारशिव, वर्दडीवैराळ, दुधा, मुंदेफळ आदी गावच्या ग्रामसेवकांनी स्वच्छ भारत मिशनच्या कामात हलगर्जी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची वेतनवाढ रोखण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांना दिल्या आहेत.