राज्यातील १४३ कत्तलखाने बंदचे आदेश
By Admin | Updated: March 27, 2015 01:39 IST2015-03-27T01:39:41+5:302015-03-27T01:39:41+5:30
शेगाव व खामगाव येथील कत्तलखान्यांचा समावेश.

राज्यातील १४३ कत्तलखाने बंदचे आदेश
शेगाव(जि. बुलडाणा) : सरकारचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृतरित्या चालविण्यात येणारे राज्यातील १४३ कत्तलखान्यांसोबतच शेगाव व खामगाव येथील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे. यामध्ये शेगाव शहरातील दोन्ही कत्तलखान्यांचा समावेश असून, बुधवारपासून नगरपालिकेने सदर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात बंद करण्यात येत असलेल्या कत्तलखान्यांमध्ये १२८ लहान आणि १६ मोठे कत्तलखाने आहेत. दिलेल्या र्मयादेहून अधिक प्रमाणात या कारखान्यांकडून जनावरांची कत्तल केल्या जात असल्याचे उघड झाले. तसेच कत्तलखान्यांच्या परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच सॉलिड वेस्टची व्यवस्था करण्याची सक्ती कत्तलखाने चालवणार्यांवर असताना ही यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे १६ मोठय़ा कत्तलखान्यांना तत्काळ कुलूप ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव व खामगाव शहराचा समावेश आहे. या बेकायदा कृत्याची दखल घेत हे कत्तलखाने बंद करण्याचे आदेश संबंधित पालिका मुख्याधिकार्यांना देण्यात आले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने २५ मार्च रोजी शेगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी टी.जी. मुल्लाणी यांनी शहरातील दोन्ही कत्तलखान्यांना नोटीस बजावल्या असून, या ठिकाणी कुठल्याही जनावरांची कत्तल झाल्यास पोलीस कारवाईचा इशारा देण्यात आलेल्या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. पर्यावरण कायद्याचे कलम १५ आणि मुंबई पालिका प्रांतिक अधिनियम ३९४ नुसार कत्तलखान्यांविरोधी कारवाई करण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार १ लाख रुपयांचा दंड आणि पाच वर्षांची सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयातील लक्ष्मी नरेन मोदी विरुद्ध केंद्र सरकार या सुनावणीच्या १६ मार्च २0१४ च्या निर्णयाचा आधार घेत ही कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यामध्ये समावेश असलेल्या इतर कत्तलखाने चालकांनासुद्धा नोटीस बजावण्यात येणार आहे.