१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची
By Admin | Updated: May 24, 2014 00:11 IST2014-05-24T00:05:59+5:302014-05-24T00:11:41+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार!

१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची
संग्रामपूर : सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार संग्रामपूर: जळगाव जामोद मतदार संघात होऊ घातलेली १४१ गाव पाणीपुरवठा योजना दुहेरी फायद्याची ठरणार आहे. सदर योजना वान धरणावरुन पाणीपुरवठा करणार असल्याने जनतेच्या आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर याच योजनेमुळे दोन हजार एकर बागायती क्षेत्र वाढणार आहे. खारपाणपट्याच्या या भागात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असतांना बागायतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने रब्बीचेही उत्पादन घटलेले, त्यातच पोटाचे आजारामुळे दवाखान्याचा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य कमालीचे त्रस्त होते. आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी महत्वाचे असल्याने वान धरणाच्या जळगाव जा. शहर व १४0 गावांच्या या योजनेमुळे दीड वर्षानंतर गावागावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. पाणी उपलब्धतेनंतर सुरु असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज होणारा उपसा बंद होईल व त्यातून जवळपास दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकेल. या योजनेंतर्गत ४ लाख २५ हजार लोकांना दररोज ५0 लिटर प्रतिव्यक्ती प्रमाणे जवळपास दोन कोटी दहा लाख लिटर पाणी वान धरणातून मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे. ३६५ दिवसाचे हिशोबाने हा आकडा ७७५ कोटी एवढा होतो. म्हणजेच आजच्या घडीला गावागावात पाणीपुरवठा योजनांसाठी दररोजचा विविध साधनातून होणारा उपसा बंद होईल व त्यातून वर्षाचे ७७५ कोटी लिटर पाणी वाचवता येईल. कृषीच्या हिशेबाने प्रती एकराला वर्षभरात तीन पिकांसाठी ४0 लाख लिटर पाण्याची गरज असते. पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा बंद झाल्यास वाचलेले आठशे कोटी लिटरचे जवळपासचे पाणी शेती सिंचनासाठी कामी येईल.