बुलडाणा जिल्ह्यातील १२ मोर्चेकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 02:39 IST2015-12-17T02:39:47+5:302015-12-17T02:39:47+5:30
नागपुरात संगणक परिचालकांच्या मोर्चावर लाठीहल्ला; दोघे गंभीर जखमी.

बुलडाणा जिल्ह्यातील १२ मोर्चेकरी जखमी
बुलडाणा : संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात शेकडो युवक जखमी झालेत. जिल्ह्यातील १२ युवकांचा यामध्ये समावेश आहे. संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील संगणक परिचालकांनी हिवाळी अधिवेशनावर धाव घेतली. मंगळवारी मोर्चा झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्यांची प्रशासनाशी चर्चा सुरू झाली; मात्र चर्चा सकारात्मक झाली नाही. चर्चेच्या प्रतीक्षेत संगणक परिचालक रात्रभर महाल टेकडी परिसरात ठाण मांडून बसले होते. बुधवारी सकाळी पुन्हा चर्चा सुरू असतानाच अचानक लाठीहल्ला झाला, अशी माहिती संघटनेचे बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष विजय वाशिमकर यांनी ह्यलोकमतह्णला दिली. या लाठीहल्ल्यामध्ये ५00 ते ७00 संगणक परिचालक जखमी झाले असून, बुलडाण्यातील १२ युवकांचा त्यामध्ये समावेश आहे. नांदुर्यातील प्रकाश रणित हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या पायाला जबर मार लागला आहे. जखमींमध्ये विठ्ठल खरात, प्रदीप साबे, हरीश घुमरे हे लोणारचे संगणक परिचालक तसेच जळगाव जामोद येथील अमोल भटकर, नीलेश खुपसे, शेगावचे विनायक देशमुख, कृष्णा जवंजाळ, मोताळाचे बंडू देशमुख, संदीप घोती, विजय वाशिमकर, संग्रामपूरचे दीपक पहूरकर यांचा समावेश आहे. जखमींना नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी प्रकाश रणित व विठ्ठल खरात यांना सर्वाधिक मार लागला असून, इतरांना पायावर तसेच कमरेवर जबर मुका मार लागला आहे. दरम्यान, संगणक परिचालक नागपुरातच ठाण मांडून बसले असून, संघटनेची भूमिका समोर आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे वाशिमकर यांनी सांगितले.