१२९ गावांवर जलसंकट!
By Admin | Updated: May 1, 2017 01:13 IST2017-05-01T01:13:19+5:302017-05-01T01:13:19+5:30
बुलडाणा : तापमान वाढीसह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे.

१२९ गावांवर जलसंकट!
२० टँकरद्वारे पाणीपुरवठा : १२५ खासगी विहिरींचा आधार
बुलडाणा : दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या तीव्रतेत मे हिटमुळे वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे. सदर जलसंकट दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे १८ गावांची २० टँकरद्वारे, तर १११ गावांची तहान १२५ खासगी विहिरींद्वारे भागविली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने यंदा पाणीटंचाईने उशिरा डोके वर काढले. मात्र, विक्रमी तापमान, भूजल पातळीत होणारी वेगवान घट, पाण्याचे जलद गतीने होणारे बाष्पीभवन, कोरडे होणारे जलस्रोत यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मार्चमध्ये एकही गावात टँकर नसताना एप्रिल महिन्याच्या शेवटी १८ गावांची तहान २० टँकरद्वारे भागविली जात आहे. बुलडाणा व मेहकर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या जास्त आहे. बुलडाणा तालुक्यातील चौथा, माळविहीर, हनवतखेड, गिरडा, गोंधनखेड, जांब या गावांना प्रत्येकी एका तर देऊळघाटात तीन टँकर सुरू असून रायपूर, शिरपूर या गावांना प्रत्येकी दोन टँकरद्वारे पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. देऊळघाट येथील नेहमीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणखी तीन टँकरची आवश्यकता आहे.
मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी, हिवरा साबळे, पारडी, अकोला ठाकरे, बोथा, वरवंड येथे प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील सैलानीनगर, भोगावती, देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, खामगाव तालुक्यातील निरोड, शिराळा येथे प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
१११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील पाणीटंचाई ग्रस्त १११ गावासाठी १२५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या गावात पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसल्यामुळे अधिग्रहण विहिरींव्दारे या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात चिखली तालुक्यातील ३९ गावांना ४३, संग्रामपूर तालुक्यातील १६ गावांना २४ विहिरींव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा तालुक्यातील १४ गावांना १५ तर मेहकर तालुक्यातील ४२ गावांना ४३ विहिरींव्दारे पाणीपुरवठा होत आहे. तर मलकापूर, देऊळगावराजा व मोताळा तालुक्यातील एकही विहीर अधिग्रहीत करण्यात आली नाही.