जिल्ह्याला १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 01:31 IST2017-05-01T01:31:31+5:302017-05-01T01:31:31+5:30
आता खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक

जिल्ह्याला १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताची गरज!
नानासाहेब कांडलकर - जळगाव
रासायनिक खतांवर शासनाकडून अनुदान दिले जात असल्याने या खतांचा पुरवठा फक्त शेतकऱ्यांनाच व्हावा, यासाठी १ जून २०१७ पासून रासायनिक खत खरेदी करताना कृषी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कृषी केंद्रावर असलेल्या ई-पॉस मशीनवर आपल्या बोटाचा ठसा उमटविणेही गरजेचे राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सन २०१७-१८ ची रासायनिक खतांची मागणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन असून, तेवढा साठा वेळोवेळी जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. तसेच खरीप ते बागायती विविध बियाण्यांची मागणी जिल्ह्याकरिता १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटलची असून, त्याचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी व्ही.टी. मोकाडे व जिल्हा मोहीम अधिकारी ए.ओ. चोपडे यांनी दिली.
बी-बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना आधार कार्ड नंबरची गरज राहणार नाही. कारण यावर शासनाकडून अनुदान दिले जात नाही. परंतु रासायनिक खतांवर शासनाकडून सबसीडी दिली जात असल्याने रासायनिक खत निर्मितीच्या कारखानदारांना शासनाकडून तो निधी वर्ग केला जातो; परंतु तेवढी खत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पांतर्गत आधार कार्ड नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना जे खतांचे भाव आहेत, त्याच भावात खते मिळणार आहे. कारण हे भाव सबसीडी गृहीत धरुनच ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे गॅस सिलींडरप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणताही निधी जमा होणार नाही. तसेच प्रत्येक कृषी केंद्रावर ई-पॉस मशीन ठेवण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांना आपला बोटांचा ठसा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८५० ई-पॉस मशीन पुरविण्यात येणार आहेत. कृषी केंद्रधारकांचे याबाबत प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले आहे.
मागणीप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा होणार
बुलडाणा जिल्ह्यात सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. तेवढा पुरवठा संबंधित कंपन्यांकडून करण्यात येणार आहे. युरिया एसएसपी, डिएपी, एमओपी, १५:१५:१५, २०:२०:१३, १०:२६:२६, १६:१६:१६, १२:१२:१६, २४:२४:०, १९:१९:१९, १७:१७:१७ अशा रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्याकरिता ११ हजार, चिखली तालुक्याकरिता १२ हजार २२५, देऊळगाव राजा १० हजार ७०, जळगाव जामोद ९ हजार ६४५, खामगाव ११ हजार ६७५, लोणार ८ हजार ७७५, मलकापूर १० हजार १२०, मेहकर १२ हजार २७५, मोताळा ९ हजार ७१५, नांदुरा ९ हजार ४५, संग्रामपूर १० हजार १००, शेगाव ९ हजार ९३० तर सिंदखेडराजा तालुक्याकरिता ११ हजार ४२५ मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज राहणार आहे. कृषी विभागाने मागणी संबंधित विभागाला दिली असून, तेवढा पुरवठा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
बियाण्यांची गरज १ लाख ३६ हजार क्विंटलची
जिल्ह्यातील सर्वाधिक लागवड ही सोयाबीन पिकाची होते. अनेक शेतकरी मागील वर्षाचे सोयाबीनचे बियाणे वापरतात, तरीसुध्दा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची मागणी येत्या खरीप हंगामात १ लाख १५ हजार ५९० क्विंटलची राहणार आहे. ज्वारी बियाणे १३८० क्विंटल, बाजरी २५ क्विंटल, मका बियाणे ४५०० क्विंटल, तूर ५७३७ क्विंटल, मूग २७३० क्विंटल, उडीद २३४० क्विंटल, भूईमूग १७५ क्विंटल, तीळ ३७ क्विंटल व कापूस बियाणे ४०२५ क्विंटल एवढ्या बियाण्यांची गरज जिल्ह्याला राहणार आहे. तालुकानिहाय विचार केल्यास बुलडाणा तालुक्याला १३ हजार ६९४ क्विंटल, चिखलीला १४ हजार ९७४, देऊळगाव राजा ११ हजार ५६८ क्विंटल, जळगाव जामोद ६ हजार ४३२, खामगाव १२ हजार ८३४, लोणार ११ हजार ४८२, मलकापूर ७ हजार ७३७, मेहकर १५ हजार ५९०, मोताळा ६ हजार ५६७, नांदुरा ५ हजार ८४२, संग्रामपूर ६ हजार ६३७, शेगाव तालुक्याला ७ हजार ५०७ तर सिंदखेड राजा तालुक्याला १५ हजार ६७५ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. तेवढी मागणी नोंदविण्यात आली असून, बियाण्यांचा पूर्ण पुरवठा होणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, खामगाव या तालुक्यांची बियाण्यांची मागणी सर्वाधिक आहे. तुलनेत इतर तालुक्यांची बियाण्यांची मागणी कमी आहे. बियाण्यांवर शासन अनुदान देत नसल्याने याकरिता आधार कार्ड नंबर व ई-पॉस मशीनमध्ये बोटांचा ठसा उमटविण्याची गरज नसल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.