तुमसरात एटीएम रिकामे
By Admin | Updated: October 13, 2016 00:54 IST2016-10-13T00:54:57+5:302016-10-13T00:54:57+5:30
८ ते १२ आॅक्टोबरपर्यंत बँकाना सुट्टी होती.

तुमसरात एटीएम रिकामे
बँकांवर प्रश्नचिन्ह : दसऱ्याच्या खरेदीपासून वंचित
तुमसर : ८ ते १२ आॅक्टोबरपर्यंत बँकाना सुट्टी होती. सर्वसामान्य खातेदार एटीएममध्ये गेल्यावर एक-दोन एटीएम सोडल्यास उर्वरीत सर्वच एटीएममध्ये रोख रक्कम संपली होती. एटीएम रिकामे असल्याने खातेदारांची तारांबळ उडाली. कोणत्या एटीएममध्ये रोख मिळेल याकरिता खातेदार धावपळ करताना दिसले. यामुळे बँकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
२४ तास खातेदारांना रोख रक्कम कुठेही उपलब्ध व्हावी या हेतून एटीएम सेवा सुरू करण्यात आली, परंतु त्या सेवेचा लाभ होण्यापेक्षा खातेदारांची उलट डोकेदुखी वाढली आहे. ८ ते १२ आॅक्टोबरपर्यंत बँकाना सलग सुटी होती. पहिल्याच दिवशी सर्वच प्रमुख बँकाचे एटीएम रिकामे झाले. अनेक खातेदार एका एीएमधून दुसऱ्या एटीएमकडे धावपळ करताना दिसले. एटीएमबाहेर बँक प्रशासनाने रोख संपल्याची सुचना सुद्धा लावली नव्हती. त्यामुळे खातेदार एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याकरिता सोपस्कार करीत होते नंतर त्यांना रोख नाही याची माहिती प्राप्त होत होती. यात वेळ व मानसिक त्रास झाला.
एटीएममध्ये रोख संपल्यावर त्यात रोख घालण्याचा नियम आहे, परंतु येथे तसे झाले नाही. येथे एटीएमचा मुळ उद्देश फसला आहे. शहरातील एक-दोन एटीएम वगळता इतर सर्व एटीएम रिकामे होते. मध्यम वर्गीय व नोकरदार खातेदार घरी रोख ठेवण्यापेक्षा एटीएमचा जास्त वापर करतात. एटीएम रिकामे आहे हे कळल्यावर त्यांचे संपूर्ण नियोजन ढासळले. दसऱ्या सारख्या सणाला खरेदीपासून अनेक जण वंचित राहिले. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली, प्रत्येक बँक एटीएम घेण्याचे आवाहन करते परंतु बँक प्रशासन नियोजन करीत नाही. नियोजनाच्या अभावी सर्वसामान्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो. बँक प्रशासन नियमाचे तुणतुणे वाजविते. परंतु नियमांचे पालन करीत नाही. (तालुका प्रतिनिधी)
भंडाऱ्यातील एटीएम मध्येही ठणठणाट
सलग सुट्यांमुळे भंडाऱ्यातील एटीएममध्येही ठणठणाट आहे. भंडारा शहरात जवळपास २५ च्या वर एटीएम आहेत. सोमवार वगळता शनिवारपासून बँकांना सुटी असल्यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी होती. परिणामी एटीएम मधील कॅश लवकर संपली. सोमवारी बँकांनी एटीएम मध्ये कॅश घातली असली तरी काढणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ती दसऱ्याच्या पूर्व संध्येलाच संपली. परिणामी ऐन दसऱ्याच्या दिवशी बँकाही बंद व एटीएममध्येही रोकडचा अभाव असल्याने नागरिकांची मोठी पंचायत झाली. ज्यांनी आधीच एटीएम मधून पैसे काढले त्यांची मात्र सोय झाली.