बंद बिडी कारखान्यामुळे कामगार संकटात
By Admin | Updated: May 1, 2016 00:19 IST2016-05-01T00:19:48+5:302016-05-01T00:19:48+5:30
जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने महिनाभरापासून बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२ हजार कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.

बंद बिडी कारखान्यामुळे कामगार संकटात
भंडारा : जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने महिनाभरापासून बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२ हजार कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. बेरोजगारामुळे अनेकांनी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे.
राज्यातील बिडी उद्योग आणि सरकार यांच्यात बंडलावरील छाप किती आकाराचा असावा, यावरून संघर्ष चालू आहे, त्यातून महिनाभरापासून बिडी कारखाने बंद पडले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील २२ हजार बिडी कामगार आणि संबंधित रोजंदारांवर झाला आहे. बिडी कामगारांची तर रोजीरोटीची पंचाईत झाली आहे. केंद्र सरकारने बिडी बंडलावर ८५ टक्के सचित्र वैज्ञानिक इशारा घालण्याचे बंधन १ एप्रिल २०१६ पासून लागू केले आहे. या जाचक अटी मान्य नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक बिडी कारखाने बंद आहेत. अशिक्षित आणि बेरोजगार महिला हा व्यवसाय गृहउद्योग म्हणून करतात, त्यांना रोजंदारीवर काम करावे लागते. एक महिला साधारण एक हजार बिड्या रोज बनवते. हा रोजगारच बंद झाल्याने त्याचे दैनंदिन उत्पन्न बुडाले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी व तुमसर तालुक्यात अधिक प्रमाणात बिडी कामगार आहेत. त्याचा उदरनिर्वाह हा बिडी व्यवसायावर अवलंबून आहेत. बिडी उद्योग बंद झाल्यास बेरोजगारी वाढेल. बिडी कामगार व उद्योग वाचला पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)
मुलभूत हक्कापासून अनेक कामगार वंचित
जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या उद्योगात जवळपास ११ हजारांच्या घरात कामगार कामे करतात. परंतु शासनाच्या व व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे किमान वेतन, बोनस, घरभाडे भत्ता, अतिरिक्त कामाचा मोबदला, राष्ट्रीय सणाच्या सुट्टया, सुरक्षा व आरोग्यसंबधी मुलभूत हक्कापासून कामगारांना वंचीत ठेवल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यात कामगार धोकादायक कामे करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. यामुळे अनेकदा कामगारांचा बळी गेलेला आहे. तरीही आजही बहुतांश कामगार तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. याविषयी व्यवस्थापनाला विचारणा केली तर व्यवस्थापन त्या कामगाराला कामावरुन काढण्याची धमकी देतात. जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, उपसंचालक औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभागाचे कार्यालय भंडारा येथे आहेत. मात्र बोटावर मोजण्या इतक्याच कामगारांच्या समस्या सोडविण्यात त्यांना यश आले आहे. अनेक समस्या जैसे थे आहेत.
कामगारांच्या आरोग्य व सुरक्षासाठी इएसआय राज्य विमा योजना लागू करण्यासाठी संघटना प्रयत्नरत आहे. जिल्ह्यातील औद्यागिक कारखान्यातील कामगरांवर अन्याय होत असल्यास संघटनेकडे तक्रार करावी. कामगरांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येईल. यापूर्वी अनेक कामगारांना न्याय दिलेला आहे.
- श्रीकांत पंचबुध्दे
अध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ