गणेशपूर उपसा सिंचन योजनेचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:49 IST2021-02-26T04:49:23+5:302021-02-26T04:49:23+5:30
तुमसर: आदिवासीबहुल गणेशपूर परिसरात ३५ कोटींच्या उपसा सिंचन योजनेचे काम रखडले असून २०१८ मध्ये विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सर्वेक्षण करण्यात ...

गणेशपूर उपसा सिंचन योजनेचे काम रखडले
तुमसर: आदिवासीबहुल गणेशपूर परिसरात ३५ कोटींच्या उपसा सिंचन योजनेचे काम रखडले असून २०१८ मध्ये विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर प्रस्ताव मंत्रालयात धूळखात आहे. त्यामुळे आदिवासींच्या शेती सिंचनाअभावी पडीक आहेत.
बावनथडी प्रकल्पाजवळ गणेशपूर,पवणारखारी, येदरबुची, सुंदरटोला, सीतासावांगी, गोबरवाही, हेटीटोला या गावांकरिता गणेशपूर उपसा सिंचन योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. ३५ कोटींची योजना तयार केली. विदर्भ सिंचन महामंडळातर्फे या योजनेचा सर्व्हे करण्यात आला. तसा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला. परंतु, सदर प्रस्ताव धूळखात आहे. त्यामुळे आदिवासींची शेती सिंचनाअभावी पडीक आहे. या परिसरात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. त्यांना रोजगाराकरिता भटकावे लागते. सिंचनाची सोय निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना येथे शेतीतून पिके काढण्यास मदत होईल. बावनथडी प्रकल्पातून येथे सिंचनाची सोय होऊ शकते.
बॉक्स
रोटेशन पद्धती बंद करावी
बावनथडी प्रकल्पातून रोटेशन पद्धतीने शेतकऱ्यांना पाणीवाटप करण्यात येते. सदर पद्धती बंद करावी. प्रकल्पाजवळील गावातील शेतीच्या पाणी विसर्गामुळे मोठे नुकसान होत आहे. कायमस्वरूपी तोडगा येथे काढण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे.