महिलेला गुन्हेगार ठरवून अपमानास्पद वागणूक
By Admin | Updated: May 3, 2016 00:46 IST2016-05-03T00:46:55+5:302016-05-03T00:46:55+5:30
भंडारा शहरातील बैरागी वाडा येथे वास्तव्यास असणाऱ्या शबनम शहजादा अली खान हिला कामठी येथे एका बँकेत घडलेल्या ...

महिलेला गुन्हेगार ठरवून अपमानास्पद वागणूक
शिवसेनेचे निवेदन : दोषींवर कारवाई करण्याची मागणी
भंडारा : भंडारा शहरातील बैरागी वाडा येथे वास्तव्यास असणाऱ्या शबनम शहजादा अली खान हिला कामठी येथे एका बँकेत घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी केवळ चेहऱ्यामध्ये साम्य दिसते या कारणावरून भंडारा येथून स्थानिक गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि कुठलीही चौकशी न करता या महिलेला सदर गुन्ह्यात दोषी ठरवून तिच्यावर पोलीसी अत्याचार केल्यामुळे सदर प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनाद्वारे आपणास करण्यात येत आहे.
दि. २२ एप्रिल २०१६ रोजी कामठी येथील एका बँकेत सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पैसे चोरल्याची एक घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजवरून कामठी पोलिसांनी सदर महिलेचा चेहरा लगतच्या सर्व जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडे पाठविला. त्याच चेहऱ्यामध्ये साम्य असलेली एक महिला शहरातील बाजारात फिरत असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला ताब्यात घेतले. परंतु या महिलेचा यापूर्वी कुठल्याही गुन्ह्याशी संबंध आहे का? ही महिला गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे का? घटनेच्या वेळी ही महिला कुठे होती याची साधी चौकशीही न करता सदर महिलेला गुन्हेगार ठरवून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
भंडारा शहरात नगर परिषदेतर्फे चौकाचौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर महिला ही घटनेच्या वेळी भाजी बाजारात गेली असल्याचे स्पष्ट फुटेजमध्ये दिसत आहे.
या महिलेला मात्र पोलीसी कार्यवाहीपोटी कधी नागपूर ग्रामीण पोलीस तर कधी वर्धा पोलीस असा प्रवास आतापर्यंत करावा लागला असून या पोलीस कारतवाईत थर्ड डिग्रीचाच नव्हे तर इलेक्ट्रीक शॉकसुद्धा दिल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत असल्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शबनम खान या महिलेला सदर गुन्ह्यातून निर्दोष सोडून दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुका प्रमुख अनिल गायधने, शहर प्रमुख नितीन साकुरे, पं.स. उपसभापती ललित बोंद्रे, विशाल लांजेवार, धनंजय धुळसे, यशवंत सोनकुसरे, मयूर लांजेवार, मुकेश थोटे, रोशन कळंबे, यशवंत टिचकुले आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)