कर्माशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य
By Admin | Updated: April 20, 2016 01:01 IST2016-04-20T01:01:36+5:302016-04-20T01:01:36+5:30
मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे.

कर्माशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य
निकेश भक्तमाली महाराजांचे प्रवचन : तुमसरात श्रीराम कथा
तुमसर : मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे. अर्थात बेईमानी करून कर्म केले व मला भगवंताची प्राप्ती झाली नाही असे होणार नाही. श्रेष्ठ कर्म करताना सत्यता व शुद्धता जीवनात अंगीकारावी लागेल तरच परमेश्वराची प्राप्ती होईल असे प्रवचन निकेश भक्तमाली महाराज यांनी केले.
तुमसर येथे श्री हनुमान रामायण मंडळ द्वारा आयोजित श्रीराम कथेच्या प्रवचनात तृतीय पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. महाराज म्हणाले, प्रत्येक व्यक्ती जीवनात कर्म करताना प्रामाणिकतेला भर दिला पाहिजे. यात शिक्षक, डॉक्टर, कंत्राटदार, शासकीय अथवा खासगी कर्मचारीही कर्मप्रधान बनला पाहिजे. आपल्या निष्पाप कर्माने भगवंत प्रसन्न होतो. भारतीय संस्कृती विविधतेने नटली आहे. या संस्कृतीत चांगल्या चारित्र्याचा समावेश आहे. वेद, शास्त्र भारतीय संस्कृतीची आधारशिला असून पाश्चात्य संस्कृतीच्या गवगवामुळे आजची तरुण पिढी व्यसनात गुंतली आहे. त्यांना बाहेर काढायचे असेल तर वेद शास्त्रांसह चांगल्या संस्काराची रूजवण त्यांच्यामध्ये अंगीकारणे गरजेचे आहे. प्रभू रामचंद्रांनी वैदीक धर्माची स्थापना करून याच बाबीला प्राधान्य दिले होते. सदर प्रवचन २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या श्रीराम कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. यावेळी महावीर प्रसाद अग्रवाल, शिक्षक बघेल, हरिभाऊ अग्रवाल, सविता दुबे, कविता साखरवाडे, डॉ. प्रभाकर शेंडे, डॉ.गायधने, अनिलकुमार शेंडे यांच्यासह शेकडो भावीकगण उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)