अपघातानंतर तरी रस्त्यांची दुरुस्ती होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:20 IST2017-11-04T00:19:50+5:302017-11-04T00:20:07+5:30
भिलेवाडा ते खडकी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला आणखी किती बळी हवेत असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अपघातानंतर तरी रस्त्यांची दुरुस्ती होणार का?
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : भिलेवाडा ते खडकी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला आणखी किती बळी हवेत असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
२ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास बेलगावजवळ घोनमाडे कुटुंबीयातील दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात बळी गेला. एकीला कायमचे अपंगत्व येण्याचा धोका निर्माण झाला असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आतातरी हा रस्ता दुरुस्ती करण्याचे सौजन्य दाखविणार कि नाही, असा प्रश्न उपस्थित करून रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भिलेवाडा ते खडकी या १८ किमीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला जोडणाºया भिलेवाडा ते खडकी रस्ता मरणयातना भोगत आहे. खोल खड्डे व आडव्या नाल्यांमुळे वाहन चालविणे कठिण झाले आहे. वाहनचालकांचा जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत आहे. रस्त्याच्या कडा पूर्णत: उखडल्या असून रस्त्याच्या कडेला वाहने थांबविता येत नाही. पावसाळ्यात तर कडेला वाहन थांबविल्याने अनेक वाहने उलटली. रस्त्यावर चिखल आल्याने घसरुन अनेकांना अपंगत्व आले. आडव्या नाल्या, धोकादायक रस्त्याच्या कडा व तुटलेल्या पुलांच्या रॅलींगमुळे अनेक अपघात घडले आहेत. पंरतु बांधकाम उपविभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. भिलेवाडा ते खडकी मार्गाच्या डांबरीकरण, मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी निधी मंजुर आहे. बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती न केल्यास राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करु, अशा इशारा जि.प. सदस्य उत्तम कळपते, नितू सेलोकर, सुरेखा फेंडर, प्रभु फेंडर, हितेश सेलोकर व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.